*कोकण Express*
*महामार्गासह सागरी किनारा महामार्गाच्या पुर्ततेसाठी संघटितपणे प्रयत्न करावेत*
*गडकरी-चव्हाण यांच्याकडून मोठी अपेक्षा- मोहन केळुसकर*
*कणकवली ः प्रतिनिधी
राज्यातील कोकण वगळता अन्य भागातील बहुतांशी राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास गेले आहे. सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींच्या जागृतेमुळेच हे शक्य झाले आहे. मात्र नियोजनानुसार सन २००० मध्ये पुर्णत्वास होण्याची अपेक्षा असणार्या या मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्गासह पश्चिम किनारी महामार्गाचे भिजत घोंगडे किमान २०२३ पर्यंत तरी पुर्ण करण्यासाठी कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण या भाजपच्या पक्षातील मंत्र्यांनी आता तरी पुढाकार घेऊन या दोन्ही महामार्गांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा केळुसकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई -कोकण-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्ततेसाठी पत्रकारांना आंदोलन करावे लागले. तरीही हा महामार्ग अद्यापपर्यंत पुर्ण होऊ शकला नाही, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणाले, कोकण किनारपट्टीतील गावे, शहरे एकमेकांना जोडून त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी कोविआ १९७८ पासूनच पश्चिम किनारी सागरी महामार्गासाठी परिषदांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लोकप्रतिनिधींमध्ये विकास कामांच्या पुर्ततेसाठी एकोपा नसतो. त्यामुळेच या दोन्ही महामार्गांची कामे रखडत चालली आहेत.
वास्तविक राज्य सरकारने सागरी महामार्गाला समृद्धी महामार्गाचा दर्जा दिला आहे. निधीही जाहीर केला आहे. तरीही या कामाच्या पुर्ततेसाठी कुठल्याच पक्षांतील लोकप्रतिनिधी आवाज उठविताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, वास्तविक या पुर्वीच्या दुपदरी महामार्गाचे रस्त्याची कामे बहुतांशी पुर्णत्वास गेली आहेत. तीन खाड्यांवरील पुले व्हायची बाकी आहेत. या पुलांसह चौपदरीकरणासाठी जमीन संपादनाच्या कामासाठी आणि भरीव आर्थिक निधी उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकोप्याने काम केल्यास हे दोन्हीही महामार्गांचे काम डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पुर्णत्वास जाऊ शकेल.