*कोकण Express*
*केवळ अनुदानसाठी प्रशिक्षण नकाे – सुनील देसाई*
*फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. फळबाग लागवडीतून शेतकरी आर्थिक सक्षम बनला नाही. शेळीपालन करणे हे कमी प्रतिष्ठेचे समजले जाते त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय दुर्लक्षित राहिला आहे. कोणत्याही व्यवसायाला प्रतिष्ठा देण्याचे काम हे त्या व्यावसायिकाचे असते शास्त्रोक्त पध्दतीने शेळीपालन व्यावसाय केल्यास त्यातून फार मोठ्या प्रमाणात पैसा व प्रतिष्ठा मिळू शकते. केवळ अनुदान मिळवे या उद्देशाने प्रशिक्षण घेऊ नये असे मत फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उद्योजकता विकास केंद्राचे माजी संचालक सुनील देसाई यांनी व्यक्त केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषिविज्ञान केंद्र किर्लोस मार्फत आणि आबू पटेल मित्रमंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम फोंडाघाट महाविद्यालय संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र सावंत, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. भास्कर काजरेकर, प्रशिक्षक डॉ. केशव देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोमा सकपाळ, जयवंत जाधव, लोबो प्रा. डॉ. बालाजी सुरवसे आदी उपस्थित होते. सुनील देसाई यांनी आदिवासी, अल्पभूधारक, भूमीहिन, दारिद्रयरेषेखालील व्यक्ती, महिला, अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती अशा विविध प्रवर्गांतील लोकांसाठीचे शासनाच्या विविध विभागांच्या व विविध महामंडळांच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने व्यवसाय केल्यास हमखास यश मिळते असे सांगीतले.
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. भास्कर काजरेकर म्हणाले, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्रामार्फत “समृद्ध आणि आनंदी गाव” ही संकल्पना ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे, तिला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत यापुढे फोंडाघाट परिसरात महिला, शेतकरी तसेच युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोमा सकपाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती व शेतीपूरक व्यवसायासाठीच्या विविध कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार – स्वयंरोजगाराकडे वळावे असे आवाहन केले.
*फोंडाघाट येथे लवकरच अॅग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीची स्थापना* आबू पटेल यांनी फोंडाघाट परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लवकरच अॅग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कंपनीमार्फत शेतक-याना शेती व शेतीपूरक व्यवसाय, फळप्रक्रिया व्यवसाय अशा विविध व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे असे सांगितले.
यावेळी विविध प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी आभार मानले.