*कोकण Express*
*समाज विकासासाठी कायदेविषयक साक्षरता महत्त्वपूर्ण : न्यायाधीश टी. एच. शेख*
*”कणकवली कॉलेजमध्ये कायदेविषयक साक्षरता अभियान संपन्न”*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सर्व नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे. कोणत्याही घटकाने स्वतःवरती अन्याय सहन करू नये, किंवा इतरावरती अन्याय करू नये. समाजामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचावा यासाठी सर्व नागरिकांनी कायदेविषयक माहिती घेणे आवश्यक आहे. असे मत न्यायाधीश टी. एच. शेख यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष आयोजित कायदेविषयक साक्षरता अभियान प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले .अॅड एम. एम. सावंत उपस्थित होते.
अमली पदार्थ प्रतिबंध कायदा व रॅगिंग प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन करताना अॅड. सावंत यांनी विद्यार्थ्यांना सदर अपराधाबद्दल न्यायपालिकेकडे कशी दाद मागू शकता व अपराधीस कोणती शिक्षा होते याबद्दल माहिती दिली.
याच प्रसंगी प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले यांनी मार्गदर्शन करताना रॅगिंग व अमली पदार्थाचे सेवन यामुळे समाजावरती कसा विपरीत परिणाम होतो, व्यसनाधीनता व रॅगिंग यामुळे शरीराबरोबरच मनालाही इजा पोहोचते त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टी पासून दूर राहावे असे आवाहन केले.
सदर अभियानाचे आयोजन प्रा. सुरेश पाटील, प्रा. मीनाक्षी सावंत, प्रा. मनीषा सावंत, प्रा. विनया रासम, प्रा. सागर गावडे, प्रा. अदिती मालपेकर यांनी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. मनीषा सावंत यांनी तर सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी150 विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा. सौ. विनया रासम यांनी मानले.