*कोकण Express*
*…. तब्बल दहा वर्षानंतर तिने घातले अंगावर अलंकार*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
…. तब्बल दहा वर्षानंतर तिने घातले अंगावर अलंकार… कपाळावर कुंकू… हातात हिरव्या बांगड्या …गळ्यात मंगळसूञ.. केसात फूलांचा गजरा .. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिच्य बदललेल्या रुपाचे स्वागत केले. अन उदास चेहऱ्यावर हास्य फुलले.. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा अलंकार देऊन सन्मानित केले.
कोकिसरे बौध्दवाडी येथील सुहासिनी रामचंद्र जाधव यांच्या पतीचे १०.वर्षापूर्वी निधन झाले होते. परंपरेनुसार पतीच्या निधनानंतर सर्व अलंकार उतरवून त्या विधवेचे जीवन जगत होत्या.
सध्या महाराष्ट्रभर विधवा अनिष्ट प्रथांविरोधात प्रचार व प्रसार सुरु आहे.सुहासिनी यांच्या जाऊबाई संजीवनी जाधव या जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांसह इतर प्रश्नांवर काम कारणा-या विकास प्रबोधनी या संस्थेच्या कृतीशील कार्यकर्त्यां आहेत. राज्यात विधवा अनिष्ट प्रथा बंदीबाबत जनजागृती सुरु असताना आपण मागे राहाता कामा नये. तर या प्रथे विरोधात आपल्या घरातूनच आवाज उठविण्याचा संकल्प केला. त्यांचे पति शशिकांत जाधव यांनी तसेच अन्य कुटुंबांतील सदस्यांनीही त्याला पाठींबा दिला. विधवा अनिष्ट आपल्या घरातून हृदपार करण्याचा संकल्प केला. आपली विधवा जाऊ आपल्यासारखीच दिसली पाहीजे. तिने विधवा प्रथा झुगारुन देऊन पहिल्या सारखे आपल्या अंगावर अलंकार घालून उर्वरित आयुष्य चारचौघीं सारख आनंदाने राहावे. या भावनेतून त्यांनी आपल्या जाऊबाईला हे पटवून सांगितले. याला सुहासिनी यांनीही सहमती दर्शवली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कोकिसरे येथील घरी सन्मानाने त्यांना त्यांचे अलंकार प्रदान करण्यात आले.
यावेळी विकास प्रबोधनी सिंधुदुर्ग अध्यक्षा अनुया कुलकर्णी, सुरेखा भिसे, प्राची पारकर, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, कोकिसरे सरपंच अवदूत नारकर, माजी सरपंच दत्ताराम सावंत, सदस्य प्रमोद जाधव, श्रीमती आम्रसकर, अशोक जाधव, प्रितम जाधव, ग्रामसेवक वाघमोडे, यांच्यासह कोकिसरे येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विकास प्रबोधनीच्या अध्यक्षा अनुया कुलकर्णी म्हणाल्या, विधवाना अलंकार देऊन त्यांना त्यांनी समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार देत आहोत. माञ फक्त अलंकार देऊन चालणार नाही तर त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहीजेत. आजही स्ञीयां सर्वच बाबतीत पुरुषांवर अवलंबून राहातात. जर त्यांच्या मनाप्रमाणे वागले नाही तर तिला नावे ठेवली जातात.पतीच्या निधनानंतर तर तिला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. विधवा स्ञीयांना सन्मानाने जगता यावे म्हणून टाकलेले हे पहीले पाऊल आहे. असे सांगत त्यांनी जाधव कुटुंबीयांचे कौतुक केले. तर शारदा कांबळे यांनी विधवा स्ञीयांची समाजात होत असलेली अहवेलना विषद करीत पतीच्या निधनानंतरही तिला तिचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच जगण्याचा हक्क आहे. तो समाजाने मान्य करायला हवा असे सांगितले .

