*कोकण Express*
*करुळ घाटातून २५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहतूक बंद*
*जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढली अधिसूचना*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
करुळ घाटात संरक्षण भिंत कोसळल्याने सदर रस्ता अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित झालेला आहे. त्यामुळे सदर रस्ता दि. २५ ऑगस्ट पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढली आहे.
या अधिसूचनेनुसार करुळ घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम विना अडथळा पूर्ण होण्यासाठी मौजे एडगाव ( एडगाव तिठा) ते करुळ घाट गगनबावडा हद्दीपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक दि. २५ ऑगस्ट पर्यंत बंद करुन कोल्हापूर वरुन येणारी अवजड वाहने खंडासरी ( क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कडे तसेच गोवा वरुन कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्यावरुन फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होतील.
मोटार वाहन कायदी १९८८ मधील कलम ११५ व गृह विभागाकडील अधिसूचना क्र.एमव्हीए ०५८९/सीआर १०६१ डीआरए २ नुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दि. २५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी वरील मौजे एडगाव (एडगाव तिठा) ते करुळ घाट ता. वैभववाडी –गगनबावडा हद्दीपर्यंत महामार्ग हा सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतुक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतुक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची कार्यवाही करावी असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.
