हिमालयालाही हेवा वाटावा असा सह्याद्रीचा सुपुत्र….! -अनुपम कांबळी©

हिमालयालाही हेवा वाटावा असा सह्याद्रीचा सुपुत्र….! -अनुपम कांबळी©

*कोकण Express*

*हिमालयालाही हेवा वाटावा असा सह्याद्रीचा सुपुत्र….! -अनुपम कांबळी©*

*”मी योद्धा आहे…*

*जखमांची भीती बाळगुन भागायचं नाही…*

*जन्माबरोबर सुरु झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवल पाहिजे…*

*त्यातच माझ्या जीवनाच यश सामावल आहे…!”*

सुप्रसिद्ध लेखक रणजीत देसाई यांनी ‘राधेय’ कांदबरीत लिहिलेल्या या ओळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठीच लिहिल्या असाव्यात एवढे राजकीय हल्ले त्यांनी आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात पचवले आहेत. तरीही प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जात या माणसाने आपला संयम कधीही ढळू दिला नाही. सुरुवातीला फोटोग्राफीत रमणाऱ्या उद्धव ठाकरेंनी २००३ साली महाबळेश्वरच्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत ‘कार्याध्यक्ष’ पदाचा काटेरी मुकुट आपल्या शिरावर परिधान केला. त्यांना बाळासाहेब ठाकरेंसारख्या आभाळाएवढे कर्तुत्व असलेल्या नेत्याचा वारसा पुढे न्यायचा होता. ही गोष्ट निश्चितपणे सोपी नव्हती. त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा होता. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणून वडीलांच्या नेतृत्व शैलीसोबत तुलना केली जात होती. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी शिवसेना पक्षात बऱ्यापैकी जम बसवला होता. थोड्याशा आक्रमक स्वभावाच्या आणि उत्तम वक्ता असलेल्या राज ठाकरेंकडे बहुतांश शिवसैनिकांचा ओढा होता. त्यांच्या तुलनेने उद्धव ठाकरे थोडेसे मवाळ स्वभावाचे व शिवसेनेच्या आक्रमक संस्कृतीत न बसणारे असेच होते. राज ठाकरे हेच शिवसेनाप्रमुखांचे खरेखुरे वारसदार असुन शांत व संयमी स्वभावाचे उद्धव ठाकरे शिवसेनेची कमान सांभाळूच शकत नाहीत, असे परखड मत तत्कालीन अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. एका चाळीशीतील तरुणाला राजकारणातील कोणताही पूर्वानुभव गाठीशी नसताना, त्याला मिळालेल्या पदाला न्याय देऊन आपले नेतृत्व सिद्ध करण्याची एकही संधी न देता, त्याची कथोकल्पित गृहीतकांवर चुलत भावाशी तुलना करून त्याला पावलोपावली कमी लेखणे, हा खरं तर समाजाने उद्धव ठाकरेंवर केलेला एक प्रकारचा अन्यायच होता. “माझ्या भविष्याची, मला नाही जराही काळजी… उमटेल मी धरतीवरी, चमकेन त्या गगनात मी…!” या ओळीप्रमाणे आपल्यावरील टिकेला कृतीतुन उत्तर देण्याचे उद्धव ठाकरेंनी मनाशी निश्चित केले.

शिवसेना कार्याध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर २००४ साली पार पडलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला ६२ जागांवर विजय मिळाला. शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. अर्थात ही निवडणूक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे या निवडणुकीच्या यशापयशात उद्धव ठाकरेंचा तितकासा संबंध नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला वर्ष उलटायच्या आत २००५ साली नारायण राणेंनी बंडाचा झेंडा रोवला. त्यांच्या टिकेचा मुख्य रोख हा उद्धव ठाकरेंवरच होता. बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेची वाताहात होत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत शिवसेनेत तिकिटांचा बाजार केला जातोय, असे खळबळजनक आरोप त्यांनी केले. याअगोदर शिवसेनेत बंड करणाऱ्यांना शिवसैनिकांनी पळता भुई थोडी केली होती. मात्र राणेंनी शिवसेनेला रस्त्यावरच्या लढाईत जशास तसे उत्तर दिले. प्रभादेवीला सामना कार्यालयासमोर जाहीर सभा घेऊन शिवसेनेची रस्त्यावरची दहशत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. नारायण राणेंच्या पोटनिवडणुकीत शिवसेना महाराष्ट्रातील सगळ्या ताकदीनिशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली खरी, तरी सुद्धा राणेंनी शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करून प्रचंड मोठा विजय मिळवला. नारायण राणेंसोबत जे आमदार शिवसेना सोडून गेले होते त्यांच्यापैकी श्याम सावंतसारखा एखादा अपवाद वगळता सगळ्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला. नारायण राणेंच्या बंडाला महाराष्ट्रभरातून समर्थन मिळाले होते. परिणामी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि एकंदरीतच नेतृत्व क्षमतेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिवसेना नारायण राणेंच्या दिलेल्या धक्क्यातून पुरती सावरलीच नव्हती आणि मार्च २००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना विठ्ठलाची उपमा देत त्यांच्या सभोवताली बडवे गोळा झालेत, असा घणाघाती आरोप केला. बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची धुरा सोपवली हेच राज ठाकरेंच्या नाराजीचे मुख्य कारण होते. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही पक्षात समाविष्ट होण्याऐवजी स्वतःचाच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा नवीन पक्ष निर्माण केला.

नारायण राणेंनी बंड केल्यामुळे अगोदरच शिवसेना खिळखिळी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्ष औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशी दर्पोक्ती राणेंकडून वारंवार केली जात होती. त्यातच राज ठाकरेंनी नवीन पक्षाची स्थापना केल्यामुळे शिवसेनेची मराठी मते मनसेकडे वळतील आणि शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातून पुर्णतः नामशेष होईल. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व सोपवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी फार मोठी चूक केली, अशाच प्रतिक्रिया राजकीय विश्वातून व्यक्त केल्या जात होत्या. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही…पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही…” या सुरेश भटांच्या ओळींना प्रमाण मानून उद्धव ठाकरेंनी आपली संयमी वाटचाल तशाच पद्धतीने सुरु ठेवली. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा होती. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत ४५ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत १३ जागा मिळाल्या. संपूर्ण महाराष्ट्रात साधारपणे २६ लाख मते (५.७१%) मिळाली. २००४ सालच्या तुलनेत शिवसेनेच्या १७ जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या आकडेवारीत तितकासा फरक पडला नव्हता. २००४ साली साधारपणे ८४ लाख मते मिळालेल्या शिवसेनेला १० लाख मतांचा फटका बसून २००९ साली ७३ लाख मते मिळाली होती. नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या बंडानंतर शिवसेना महाराष्ट्रातुन नामशेष होईल हे भाकीत वर्तवणाऱ्या राजकीय विश्लेषकांचे दात उद्धव ठाकरेंनी एकही शब्द न बोलता घशात घातले होते. “न मैं गिरा, और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे… लेकिन मुझे गिराने मे, लोग कई बार गिरे… सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया… तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं जी गया…” अशा प्रकारे एका वर्षाच्या आत झालेली शिवसेनेतील दोन्ही मोठी बंड अतिशय पद्धतशीरपणे मोडीत काढून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेना पक्ष जीवंत ठेवत आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. त्याहीपलीकडे बाळासाहेब ठाकरेंसारखी उपजत आक्रमक शैली स्वभावात नसताना, शांत व संयमितपणे नेतृत्व करून शिवसेनेसारखा स्वभावतः आक्रमक असलेला पक्ष अतिशय सक्षमपणे पुढे नेता येतो, ही गोष्ट त्यांनी आपल्या राजकीय टीकाकारांना आपल्या अफाट कार्यपद्धतीतुन दाखवून दिली.

महत्वाकांक्षी माणसं शांत असली की समजुन जायचे एका मोठ्या युद्धाची तयारी सुरू आहे…! २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे अस्तित्व जीवंत ठेवले असले तरी महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा सन्मानाने फडकवणे हेच उद्धव ठाकरेंचे कार्याध्यक्ष म्हणुन अंतिम उद्दिष्ट होते. त्याच दिशेने त्यांनी नियोजनबद्ध वाटचाल सुरु केलेली असतानाच २०१२ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जगाचा निरोप घेतला. उद्धव ठाकरेंनी अनेक राजकीय धक्के पचवले पण हा धक्का कसा काय पचवायचा…? इतकी वर्षे प्रत्येक संकटात मुलाच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे राहणारे बाळासाहेबच त्यांच्या मुलाला एकाकी सोडून गेले. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पुन्हा एकदा शिवसेना संपणार ही चर्चा सुरु झाली. उद्धव ठाकरे एकटे काहीच करू शकणार नाहीत, अशी विधाने करून नाक मुरडणाऱ्या टिकाकारांची कुठेही कमी नव्हती. त्याच दरम्यान २०१४ साली संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली. भाजपने लोकसभा निवडणुकीत २८२ जागांवर विजय मिळवून एकहाती बहुमत मिळवले आणि इतकी वर्षे संकटकाळात जीवाभावाची साथ देणाऱ्या शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री पदासारखे कमी दर्जाचे खाते देऊन कुरघोडी करण्याचा पहिलाच प्रयत्न केला गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यामुळे एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरेंना चारी बाजुंनी खिंडीत पकडून महाराष्ट्रातून शिवसेनाच संपवून टाकण्याचा कट दिल्लीच्या वर्तुळात आखला जाऊ लागला. विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना अवसानघातकी भाजपने कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दिनांक २५ सप्टेंबर २०१४ रोजी शिवसेनेसोबतची पंचवीस वर्षांची युती संपुष्ठात आणली. महाराष्ट्रात सर्व जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची पूर्वतयारीच नसल्याने उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित मानला जात होता. “करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही….!” तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतून खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची कुमक महाराष्ट्र भाजपच्या मदतीला पाठवली. शिवसेनेला पूर्णपणे संपवून टाकण्याचा मित्रपक्ष भाजपकडून केला गेलेला तो पहिलाच प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना उद्देशून एवढेच सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य संपवून टाकण्यासाठी अफझलखान अशाच पद्धतीने दिल्लीतून लाखोंचे सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला होता. शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या साथीने दिल्लीच्या ताकदीने मस्तवाल बनलेल्या त्या अफझलखानाचा कोथळा काढून त्याचे थडगे रायगडाच्या पायथ्याशी बांधले. महाराष्ट्राचा हाच लढावू बाणा केंद्रातील सत्तेची नशा चढलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दाखवून द्यायची वेळ आली आहे.” २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवल्या आणि तब्बल ६३ जागांवर विजय मिळवला. केंद्रातील सत्तेचा अमर्याद वापर करून महाराष्ट्रातुन शिवसेना संपवण्याचे आणि एकहाती सत्त्ता स्थापन करण्याचे भाजपचे नापाक मनसुबे उद्धव ठाकरे या एका व्यक्तीमुळे पूर्णतः धुळीस मिळाले. केंद्रातील सत्त्ता आणि शिवसेनेचे अस्तित्व यांच्यामध्ये उद्धव ठाकरे पावनखिंडीतल्या बाजी प्रभू देशपांडेंप्रमाणे एकटेच उभे राहिले होते आणि शिवसेनेच्या अस्तित्वावर भाजपने केलेला हल्ला त्यांनी एकट्यानेच परतवून लावला. भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यास अडचणी येत होत्या. शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती होऊ नये याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निकाल जाहीर होत असतानाच भाजपला बिनशर्त पाठींबा देऊन नवीन खेळी करत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच कमी करून टाकली. भाजपने विधानसभेत आवाजी मतदानाच्या जोरावर विश्वासदर्शक ठराव रेटला खरा परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने सत्तेसाठी केलेली आघाडी महाराष्ट्रातील जनतेला काहीशी रुचली नाही. त्यासंदर्भात सोशल मिडियावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटताच पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना नाक मुठीत धरून मातोश्रीचीच पायरी चढावी लागली. अशा प्रकारे दहा मंत्रीपदांच्या बदल्यात शिवसेनेने भाजपला सत्तेसाठी पाठींबा देण्याचे निश्चित केले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला.

महाराष्ट्रात शिवसेना व भाजप युतीची सत्ता आली असली तरी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व नेते यांच्यातील मतभेद व मनभेद तसेच कायम राहिले. देशातील सर्वात मोठे बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा प्राण आहे आणि महाराष्ट्रातून शिवसेना पक्ष संपवायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणे अपरिहार्य आहे, हे भाजपच्या पक्षनेतृत्वाने एव्हाना ओळखले होते. महाराष्ट्रात सत्तेत एकत्र असताना शिवसेना मंत्र्यांना दुजाभाव देत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व गृहमंत्री या तीनही पदांचा अनिर्बंध वापर सुरु करून मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या दृष्टीने आपली पाऊले टाकली. उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे भाजपचे कारस्थान अगदी अचूकरीत्या हेरले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती तोडून शिवसेना पुन्हा एकदा अस्तित्वाच्या लढाईसाठी सज्ज झाली. भाजपाकडे असलेली केंद्राची व राज्याची अपरंपार ताकद पाहता मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातून निसटणार असेच अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी वर्तवले होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निकराची झुंज दिली आणि सरतेशेवटी सर्वाधिक जागा जिंकून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. शिवसेना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न सलग दुसऱ्यांदा फसला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कटू अनुभवानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबत युतीत मैत्रीचे नाटक करून पक्ष संपवण्याची भाजप नेतृत्वाची आसुरी महत्वाकांक्षा एव्हाना ओळखली होती आणि त्यादृष्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची पूर्ण तयारी देखील ठेवली होती. शिवसेनेची स्वबळाची तयारी पाहून बिथरलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहांनी भाजपच्या मेळाव्यात ‘पटक देंगे’ अशी धमकीच शिवसेनेला देऊन टाकली. त्याबरोबर आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांचे आव्हान स्वीकारले. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ आली तसतशी भाजप पक्षनेतृत्व व अमित शहांची हवा टाईट झाली आणि त्यांना केंद्रात पुन्हा सत्त्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेची गरज भासू लागली. ‘पटक देंगे’ची भाषा करणारे अमित शहा दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ रोजी नाक मुठीत धरून शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर आले. त्यावेळी भाजपला युतीची गरज असल्यामुळे सर्व वाटाघाटी उद्धव ठाकरेंच्या अटीशर्तीनुसारच होणार हे एव्हाना उघड झाले होते. गरजेच्या वेळी चुचकारायचे आणि गरज संपल्यावर रंग दाखवायचे, ही भाजपची सवय अंगवळणी पडलेली असल्यामुळे चाणाक्ष स्वभावाच्या उद्धव ठाकरेंनी यावेळी युतीसाठी अडलेल्या भाजपला खिंडीत गाठायचे निश्चित केले. लोकसभा निवडणुकीची युती करतानाच विधानसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात चर्चा करावी ही अट त्यांनी भाजप पक्षनेतृत्वासमोर ठेवली. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना समसमान जागा लढवायला मिळतील आणि सत्ता आल्यानंतर मंत्रीपदांचे देखील समसमान वाटप केले जाईल, हे भाजप पक्षनेतृत्वाकडून मान्य करून घेतले. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले आणि त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळवून केंद्रात सरकार स्थापन केले. केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींना शिवसेनेची असलेली गरज संपली होती. केंद्रीय मंत्रीमंडळात पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रीपद देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर सरड्याने रंग बदलावेत तसे भाजप नेत्यांनी रंग बदलण्यास सुरुवात केली. भाजपने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली खरी परंतु निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेल्या नारायण राणेंच्या मुलाला पक्षप्रवेश देऊन त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्यास सुरुवात केली. खर तर शिवसेनेचे कट्टर शत्रु असलेल्या राणेंच्या भाजप पक्षप्रवेशावेळीच शिवसेना व भाजप पक्षात संघर्षाची ठिणगी पडली होती परंतु भाजपला अद्दल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे योग्य वेळेची वाट पाहत होते.

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपला १०५ व शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले. शिवसेनेने निवडणूक निकाला दिवशीच पत्रकार परिषद घेऊन भाजपला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आणि भाजपने ती फेटाळून लावली. भाजप पक्षनेतृत्व पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. यावेळी प्रत्येक निवडणुकीत फसवेगिरी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जन्माची अद्दल घडवण्याचे उद्धव ठाकरेंनी मनाकडे निश्चित केले होते. त्यासाठीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षासोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा नवीन प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आणि शरद पवार हे या महाविकास आघाडीचे शिल्पकार होते. शरद पवारांच्या विनंतीला मान देत उद्धव ठाकरेंनी तीन पक्षाच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या गाठीशी कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरतील अशी प्रतिक्रिया राजकीय टिकाकारांनी दिली. त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारून तीन महिने देखील झाले नसतील आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने विळखा घातला. महाराष्ट्र राज्यात मुंबईसारखे जगातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असल्यामुळे आपल्या राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका सर्वात जास्त होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही उद्धव ठाकरे जरासुद्धा डगमगले नाहीत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घाबरलेल्या व कोरोनाच्या भीतीने बिथरलेल्या भयभीत जनतेला आपल्या संयमित बोलण्यातून धीर दिला. कोरोना काळात हा माणूस महाराष्ट्रातील जनतेला कुटुंबप्रमुख वाटू लागला. अशा प्रकारे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि कोरोना काळात आपल्या वागण्या-बोलण्यातून ते संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख देखील झाले. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेतील धारावी मॉडेलची संपुर्ण जगभरात चर्चा झाली. एकीकडे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात गंगेच्या किनाऱ्यावर कोरोनामुळे दगावलेल्यांची प्रेते तरंगत असताना संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या आश्वस्त नेतृत्वाखाली सुखरूप राहिला. देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश झाला आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडला.           कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढणाऱ्या उद्धव ठाकरेंना मानेच्या दुखण्याने बेजार केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या मानेवर शस्रक्रिया झाली पण त्यानंतर त्यांच्या शरीराची हालचाल होणेच बंद झाल्याने त्यांच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर्सनी त्यांना आठ महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. एकीकडे कोरोनासारख्या जागतिक महामारीसोबत निकराने लढाई देणारा योद्धा प्रकृती अस्वास्थ्यासमोर हतबल ठरला. त्यांना विश्रांतीच्या काळात कुणाचीच भेट घेता येईना. खरं तर राजा आजारी असताना सेनापतीने स्वतः पुढाकार घेऊन राज्याचा सांभाळ करणे नैतिकतेला धरून होते. मात्र मराठयांना फुटीचा शाप शिवरायांच्या काळापासून आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या आसुरी महत्वाकांक्षेने एकनाथ शिंदेंना पछाडले होते. दुसरीकडे सत्ता गेल्यामुळे झपाटलेल्या भाजपने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून सत्ताधारी आमदारांना जेरीस आणले होते. ईडीच्या भितीपोटी अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास किंवा त्यांच्यासोबत युती करण्यास अनुकूल होते. शिवसेना गिळंकृत करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एकनाथ शिंदेनी शत्रुशी हातमिळवणी केली आणि आजारी असलेल्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. घायाळ मी असून रणी खूप झुंजलो, ज्यांना न घाव तेच पळायास लागले….! दिनांक २० जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर रात्रीच्या काळोखात एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेने निघाले. ‘उजेडात होते पुण्य, अंधारात पाप’ याची प्रचीती संपूर्ण महाराष्ट्राला आली. शिवसेनेचा अमुक आमदार पळाला, तमुक आमदार नॉट रिचेबल झाला अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर धडकू लागल्या. “ते लोक होते वेगळे,घाईत जे गेले पुढे…. मी मात्र थांबून पाहतो, मागे कितीजण राहिले…!” अशीच काहीशी अवस्था उद्धव ठाकरेंची झाली. ज्या शिवसेनेने या आमदारांना अस्तित्व दिले, पद दिले, सर्वकाही दिले ते शत्रूच्या गोटात शिरून गुजरातेतून उद्धव ठाकरेंना सत्ता सोडण्याचे सल्ले देत होते. समुद्रात राहणाऱ्या माशाचे अश्रू कधीच दिसत नाहीत, याचा अर्थ तो कधीच रडत नाही, असा होत नाही. गुजरातेतून येणारी आपल्याच आमदारांची वक्तव्ये ऐकून उद्धव ठाकरेंसारखा स्थितप्रज्ञ माणूस मनातून हळहळला. त्यांना मुख्यमंत्रीपद गेल्याचे अजिबात दुःख नव्हते. त्यांना दुःख फक्त एकाच गोष्टीचे होते की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हात शिवसेनेच्याच आमदारांचे होते. मैने मुलको की तरह, लोगों के ‘दिल’ जीते है… ये हुकूमत किसी भी ताज की ‘मोहताज’ नहीं…! उद्धव ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न करता ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने वर्षा बंगला सोडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. मात्र यावेळी वर्षा बंगला सोडणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील कित्येकांना आपल्याच कुटुंबातील कुणीतरी सदस्य वाटत होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हे तर कुटुंबप्रमुख म्हणून वावरले याचा तो ठसठशीत पुरावा होता. घरातील काही नापाक कार्ट्यामुळे कुटुंबप्रमुखालाच घर सोडायची वेळ आली, हे दृश्य पाहून सगळीच जनता मनातून हळहळली. उद्धव ठाकरे हात जोडून वर्षा बंगल्यातून बाहेर पडत असतानाचे दृश्य टेलिव्हिजवर लाईव्ह पाहत असताना महाराष्ट्रातील घराघरात खासकरून महिला वर्गाच्या अश्रूचा बांध फुटला. एका निष्कपट, निगर्वी, सभ्य-सुसंस्कृत नेत्याला स्वकीयांनी गद्दारी केल्यामुळे जड अंतःकरणाने वर्षा बंगल्यातून बाहेर पडावे लागत होते. उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी भर पावसात मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर लोक जमा झाले. त्या जनतेच्या डोळ्यात अश्रू असले तरी मनात संतापाची आग होती. ती जनता महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला एकच संदेश देण्यासाठी रस्त्यावर थांबली होती की, “तुम्हाला वर्षा बंगल्यातून बाहेर पडावे लागत असले तरी तुम्ही आमच्या मनात कायमचे घर केलेले आहे. गद्दार पक्ष सोडून गेले तरी महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत कायम राहणार.” त्यावेळी माझ्या मनात एकच प्रश्न होता की, “उद्धव ठाकरे हा माणूस प्रत्येकालाच आपलासा का वाटतो…? एका मुख्यमंत्र्यावर किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखावर राज्यातील जनतेने एवढे निस्सीम प्रेम का करावे….??”

 

ज्यांचे मरण राञीच्या गाभ्यात अग्नीचा वारसा पेरून जाणाऱ्या सागरातील मावळतीच्या सूर्यासारखे असते, ती ‘व्यक्तीमत्व’ फार सुंदर असतात. उद्धव ठाकरेंचे व्यक्तिमत्व हे त्यापैकीच एक आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार संजय आवटे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते की, “उद्धव ठाकरेंच्या निरोपाचे आजचे भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा. पक्ष वगैरे विसरा पण आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं सगळं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं. त्याही परिस्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं यासाठी हे भाषण बघू द्या त्यांना. आयुष्यात कधीतरी तुमच्या मुलाबाळांना हे नक्कीच उपयोगी पडेल. विखारी आणि उन्मत्त हुकुमशहाचा पराभव करण्यासाठी प्रांजळ, प्रेमळ आणि नितळ माणूसच हवा असतो. धनदांडग्यांची पैशांची मस्ती उतरवण्यासाठी निःसंग, निर्मोही असा फाटका फकीरच लागतो. खलनायकांची कारस्थाने उधळून लावण्यासाठी नायक चारित्र्यवान आणि सुसंस्कृत असावा लागतो. विखाराला विखाराने, पैशांना पैशाने आणि कारस्थानांना कारस्थानाने कधीच पराभूत करता येत नाही. हा सगळा पट समजलेला पण पटात न मावणारा प्रज्ञावंत महात्माच अंतिमतः हुकुमशहांना उलथून टाकू शकतो आणि सगळी परिभाषा बदलू शकतो.” चाळीस आमदार आणि बारा खासदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे नरमतील व पुन्हा नाईलाजास्तव भाजपशी युती करतील, अशी भाजप नेत्यांची आणि गद्दार आमदारांची अपेक्षा होती. उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे रक्त आहे, या गोष्टीचा विसर भाजपच्या नेतेमंडळींना पडला होता. शिवसेना पक्षप्रमुखांनी शरणागती न पत्करता संघर्षाची भूमिका घेताच गद्दार आमदारांसोबत भाजप नेत्यांचेही धाबे दणाणले. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये आहे आणि फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेत शिवसेना पुन्हा नव्याने निर्माण करून दाखवेन, हा आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून दिसत होता. दिल्लीच्या ताकदीचा वापर करून गद्दारांच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्रावर केलेले हे आक्रमण होते. हिमालयासमोर सह्याद्री झुकणार नाही, हाच संदेश दिल्लीसमोर शरणागती न पत्करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दिला. त्यांचा हा बाणेदारपणा पाहून साक्षात हिमालयालाही सह्याद्रीचा हेवा वाटला असेल. नारायण राणे आणि राज ठाकरेंनी बंड करून शिवसेना सोडली तेव्हा राजकीय विश्लेषकांनी सांगितले की शिवसेना संपली परंतु उद्धव ठाकरेंनी त्या दोघांचेही बंड फक्त मोडूनच काढले नाही तर एकेकाळी शिवसेना संपवण्याची भाषा करणारे हे दोन्ही नेते आज राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला की उद्धव ठाकरे एकटे शिवसेना सांभाळू शकणार नाहीत आणि शिवसैनिक राज ठाकरेंच्या नेतृत्व असलेल्या मनसेत प्रवेश करतील. प्रत्यक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेची तेरावरून अवघ्या एका जागेवर घसरण झाली आणि भविष्यात लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करण्याची केविलवाणी परिस्थिती राज ठाकरेंवर ओढवली. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युती तोडल्यानंतर शिवसेना संपली अशी भविष्यवाणी अनेक राजकीय विश्लेषकांनी केली. मात्र दिल्लीचे आक्रमण उद्धव ठाकरेंनी एकट्याच्या ताकदीवर परतवून लावले आणि शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच स्वतःच्या हिंमतीवर एक कोटी मतांचा टप्पा ओलांडून भाजपाला विधानसभेत बहुमतापासून रोखले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत त्यांनी स्वबळावर सर्वाधिक जागा जिंकून भगवा फडकावला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आकडेवारी कधीही खोटे बोलत नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट आणि देशातील हिंदूंचे एकमेव नेते होते परंतु राजकारणात त्यांना १९६६ ते २००९ या चाळीस वर्षाच्या काळात १९९५ ते २००० अशी पाच वर्षेच महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेची सत्ता आणता आली. याउलट उद्धव ठाकरेंनी २००९ ते २०२२ या तेरा वर्षांच्या कारकिर्दीत आठ वर्षे शिवसेना पक्षाला सातत्याने सत्ताधारी बाकावर बसवले आणि त्यात अडीच वर्षे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले. राजकारणात सत्ता हेच जर साध्य असेल तर उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट त्यांना सर्वोत्कृष्ट नेता बनवतो. उद्धव ठाकरेंना कुणी राजकारणी मानायलाच तयार नाही, हे त्यांचे आणखीन एक वैशिष्ठय आहे. राजकारणातील आकडेवारी साक्ष आहे की उद्धव ठाकरे हे धुरंधर राजकारणी आहेत. आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा शिवसेना संपल्याची आवई उठवत आहेत. शिवसेनेतील मागच्या तीनही बंडाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डेमेज कंट्रोल करण्यासाठी होते आणि आता एकट्या उद्धव ठाकरेंना शिवसेनेची पडझड थांबवणे आता शक्य नाही, असाही युक्तिवाद त्यांच्यामार्फत केला जातोय. माझी त्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्या सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा इतिहास एकदा तपासून पाहावा म्हणजे एकनाथ शिंदे आणि इतर गद्दारांची भविष्यात काय अवस्था होईल याचा त्यांना निश्चितपणे अंदाज येईल. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्या अविर्भावात दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊतांना मुलाखत दिली, त्यातून सर्व राजकीय टीकाकारांना त्यांनी एकच संदेश दिला आहे- “नशीब हुलकावणी देत जाईल, पडून पुन्हा मी उभा राहिन… आजचा पराभव तुंम्ही लक्षात ठेवाल, उद्याचा विजय मी लक्षात ठेवीन…!” आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घआयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!