*कोकण Express*
*स्वच्छतेतून – समृध्दीकडे ही संकल्पना मूर्तरुपात येण्यास स्वतः मनुष्य जबाबदार : विनंती केसरकर*
राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार स्वच्छता पखवड्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, अजीवन अध्ययन विस्तार विभाग व विद्यार्थी कल्याण समिती आणि हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छते कडून समृध्दीकडे संकल्पनाधिष्टीत वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
गांवाचे जरी उत्तम नसलें। तरि देशाचे भविष्य ढासळले
ऎंसे मानावे जान त्याने भले। हृदया माजी।।”
संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी ज्याद्वारे गाव स्वच्छ व सुंदर असेल तरच देशाचे भविष्यही चांगले उज्ज्वल असेल, असा संदेश दिलेला आहे. त्यानुषंगाने गावच्या विकासा साठी देशातील प्रत्येक नागरिक जबाबदार असून प्रत्येकाने आपापल्या परिने योगदान करणे ही काळाची गरज आहे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान असे म्हणने वावगे ठरणार नाही. सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, तसेच जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छ राहणं व स्वच्छता राखण हेच मुळतंत्र त्यामुळे ज्यांचे आरोग्यमान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी आपले मन स्वच्छ, तर आपले घर स्वच्छ।आपले घर स्वच्छ, तर आपला परिसर स्वच्छ।।या उक्ती प्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारीही स्वत: पासून सुरु करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या मनुष्यबळ व्यवस्थापक मा. विनंती केसरकर यांनी व्यक्त केले.
मी स्वत: ही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवडयातून किमान १ तास स्वच्छता करण्याचा संकल्प प्रत्येकाने करून तसा प्रयत्नही सुरु करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मी स्वत: ही घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करु न देण्याचा प्रयत्न करण्याचा दृढ निश्चय युवकांना करावे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व या वेबिनारचे अध्यक्ष डॉ.आत्माराम कांबळे यांनी व्यक्त केले.
देव – देवतांच्या पूजेबरोबरच श्रमातूनही भक्ती करा. गाव स्वच्छ ठेवा. त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, घरांची, परिसराची, गावांची इ. ची स्वच्छता राखल्यास पर्यायाने निश्चितच देशाचीही स्वच्छता होऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची ही जोपासना होईल. जीवनमान उंचवेल. “स्वच्छतेतून – समृध्दीकडे” ही संकल्पना मूर्तरुपात येण्यास मदत होईल असे ही मत मॅडमने व्यक्त केले.
आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने स्वच्छतेमुळे पर्यावरण संतुलन होऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान, दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे, ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच आहे, हे मात्र आपण विसरतो. आपण आपल्या मनाला, शरीराला, घराला, परिसराला स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, लोकल, ऑफिस, उदयान, इमारती, रस्त्यांवर, गल्ली बोळांत, आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेट ची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्या नदया या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तर होतेच पण ग्रामीण परिसरात ही कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत. किती जण आपल्या मुलांना स्वच्छते चे महत्व सांगातात? त्याचे अनुकरण करायला सांगतात? आणि स्वत: ही त्याचे अनुकरण करतात? असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद यांनी व्यक्त केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत ही मॅडमने सह प्रात्यक्षिक प्रबोधनात्मकपणे कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टीचे आचरण करावेत या बाबत मार्गदर्शन केले.
या वेबिनारला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रीयसेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक श्री.वसीम सय्यद, महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु.भक्ती पिसे, कु.गुरुनाथ भोसले आदी स्वयंसेवक उपस्थित होते.
वेबिनारचे प्रास्ताविक श्री. वसीम सय्यद तर सुत्रसंचालन सहा. प्रा. प्रज्योत नलावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा. प्रा.रश्मी देसाई यांनी केले.