*कोकण Express*
*यशासाठी वास्तवाचे भान ठेवा*
*श्री.अनिल नेवाळकर*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
‘मी कुठे आहे आणि मला काय करायचे आहे याची स्पष्टता असली की यश मिळवणे सोपे जाते.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री.अनिल नेवाळकर यांनी केले. ते कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये आयोजित पदवीदान समारंभात संबोधित करत होते. ‘विद्यार्थ्यांना भविष्याचा प्रश्न पडतो. आणि मार्गदर्शनासाठी ते येतात त्यावेळी ते कुठे आहेत हेच त्यांना माहीत नसते. त्या विद्यार्थ्यांना मी कुठे आहे? मला काय करायचे आहे? आणि त्याबरोबर आपल्याकडे कोणती साधन संपत्ती आहे? याचे भान असणे गरजेचे आहे. राजकारणापासून दूर ठेवून माझ्या वडिलांनी आम्हाला उद्योजक केले आणि त्याचे समाधान आम्हाला मिळते आहे. तरुणानी उद्योजक बनण्यासाठी स्वतःला घडवले पाहिजे.जग तंत्रज्ञानामुळे फार वेगाने बदलत आहे.जगातील सर्व नोकऱ्या नष्ट होतील पण नवीन उद्योग सुरू करण्याची नोकरी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी जे उपक्रम आयोजित करीत आहे ते कौतुकास्पद आहे. त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. विद्यार्थ्यांनी वाचते आणि लिहिते होणे आवश्यक आहे. जो लिहितो तो जगात कधीच मागे पडत नाही. आपल्यातल्या सर्वात मोठ्या व्यक्तीनी प्रचंड वाचन आणि लेखन केले आहे.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जिल्हा परिषद माजी कृषी सभापती मा.श्री. संदेश पटेल म्हणाले की तरुणांनी तरुणाईची जाण ठेवून आपली प्रगती केली पाहिजे. स्वतःला घडवत असताना समाज सुद्धा घडत असतो. याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या पाल्यावरील चुकीच्या संस्कारामुळे समाज बिघडून जातो आणि समाज स्वास्थ्य बिघडते.असे प्रतिपादन केले.
संस्थेचे सचिव श्री.चंद्रशेखर लिंगस यांनी नेवाळकर साहेबांच्या शिस्तबद्धतेचे कौतुक केले साधारणपणे 1970 च्या दशकापासून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्योगात त्यांची असणारी शिस्त वाखाणण्याजोगी आहे आज ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हस्ते पारितोषिके घेतली त्या विद्यार्थ्यांचे भाग्य आहे. त्यांची व्यावसायिक शिस्तबद्धतेचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की नेवाळकर साहेब हे एक प्रेरणा घेण्यासारखे व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या यशाला चिकाटीची जोड आहे. स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी त्याचा ध्यास घेण्याची आवश्यकता आहे. आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. अशा विकासाचे मिळालेले बक्षीस घेताना जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2021- 22 व्या वर्षीच्या पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्याच बरोबर वर्ष 2021- 22साली घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.सतीश कामत यांनी महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाचा आढावा घेतला आणि महाविद्यालय आता प्रगतीच्या योग्य मार्गावर असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. पाहुण्यांची ओळख डॉ.बालाजी सुरवसे यांनी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या समस्या मांडल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कौशल्य आहे. परंतु अपुऱ्या साधनांमुळे त्यांचा विकास खुंटतो आणि तो मागे पडतो. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष रायबोले यांनी केले तर आभार डॉ. डी.बी.ताडेराव यानी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत,सर्व कर्मचारी वर्ग आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.