*कोकण Express*
*एखादे चांगले व्यसन माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते, तर वाईट व्यसन अधोगतीला नेते : डॉ.आत्माराम कांबळे*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या वतिने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशानुसार जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन 82 स्वयंसेवकांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
आजची तरुण पिढी ही अम्ली पदार्थांच्या खूप आहारी गेलेली आहे. आपल्या समाजामध्ये विविध प्रकारचे मादक पदार्थ पाहायला मिळत आहे, जसे की, दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट इत्यादी. मादक पदार्थाचा वापर मानवी जीवनामध्ये नवीन आहे असे म्हणता येणार नाही. कारण, मादक पदार्थांचा प्राचीन काळापासूनच उपयोग करता झालेला पाहायला मिळतो.
प्राचीन काळामध्ये गांजा, अफू, भांग इत्यादींचा उल्लेख केलेला आढळतो. आजकाल मादक पदार्थांन मध्ये हीरोइन, चरस, कोकेन यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. पूर्वी फक्त श्रीमंत वर्गालाच मादक पदार्थांचे व्यसन होते परंतु आजच्या काळामध्ये हे व्यसन सामान्य होत चालले आहे. यामध्ये तरुण पिढी ही जास्त बाधित झालेली आहे. त्याचा परिणाम भावी पिढीवर पडतो. मादक पदार्थ हे जीवनाचा शत्रू आहे. त्यामुळे मादक पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहेत.
कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनामुळे त्या व्यक्तीमध्ये व्यसनासक्ती निर्माण होते. ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या अम्ली पदार्थाच्या मात्रेवर अवलंबून राहते. शरीराच्या पेशींना त्या अमली पदार्थाची सवय लागते. अमली पदार्थ हे प्रामुख्याने मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे मेंदूच्या पेशींच्या कार्यात बिघाड होतो. अमली पदार्थाचे सेवन माणसाला जनावराच्या पातळीपर्यंत घेऊन जाते.
प्रथम मजा म्हणून, नंतर मित्रांबरोबर केलेल्या अंमली पदार्थाच्या सेवनाचे भविष्यात व्यसनांत रूपांतर होते. हे व्यसन सुटत नाही तेव्हा परिस्थिती कठीण बनते. दारू पिणे, गुटखा खाणे इथपर्यंत मर्यादित असलेले व्यसन जेव्हा अंमली पदार्थापर्यंत मोठ्यांपासून अल्पवयीन मुलांपर्यंत पोचले तेव्हा सर्वच देशासाठी हा काळजीचा विषय बनला, कारण मुले केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठीही महत्त्वाची असतात. त्यामुळे व्यसन हे देशासाठी नुकसानकारक असते, असे मत व्यक्त करीत एखादे चांगले व्यसन माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते, तर वाईट व्यसन अधोगतीला नेते असे प्रतिपादन केले.
काही वर्षापूर्वी मुले मर्दानी खेळ खेळत असल्याने ताणतणावापासून दूर असत आणि त्यांचे मन स्थिर आणि शांत असायचे. आता मुले सतत अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली असतात. टीव्ही, मोबाईल यात मग्न असल्याने मुलांची मने संभ्रमित बनली आहेत, त्यामुळे त्याचे मानसिक, भावनिक आणि बौद्धिक श्रम वाढत आहेत. अशावेळी काहीजण अंमली पदार्थांचा आधार घेतात. अंमली पदर्थाचे सेवन करणार्या बहुतेक लोकांना याचे व्यसन अल्पवयीन काळात जडलेले असते. हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. याच काळात कोणत्याही व्यसनाचा नाद घट्ट आवळला जातो. म्हणून शक्य तेवढे वाचन, लेखन, व्यायाम, गायन, वाद्य, संशोधन, छायाचित्रण, पाककृती इत्यादी वेतन हितकारक असे मत मराठी विभाग प्रमुख सहा.प्रा.रश्मी देसाई यांनी व्यक्त केले.
आजच्या आधुनिक काळात नवनवीन गोष्टींचे आकर्षण वाढून त्याचा उपयोग व अनुकरण करणे वृत्ती निर्माण झालेली दिसते मात्र अज्ञानातच लागणारे व्यसन हे घातक असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री.वसीम सय्यद यांनी केले.
या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक श्री.वसीम सय्यद, सहा. प्रा. रश्मी देसाई, सहा. प्रा. रूची तेली, सहा. प्रा. मंगल परब, व प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधि कु. भक्ती पिसे व कु. गुरुनाथ भोसले, कु. अदिती भालेकर कु. जयश्री इंगले, कु. मयुरी पवार, कु. मयूर मोरे, आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.