*कोकण Express*
*भिरवंडेत रात्रीची एसटी फेरी सोमवारपासून सुरु होणार…*
*ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला विभाग नियंत्रकांचे आश्वासन;माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पुढाकार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना कालावधी व एस. टी. संपानंतर सुरु झालेल्या एस.टी. बस सुविधेनंतर देखील कणकवली आगारातून रात्री ८ वाजता सुटणारी कणकवली ते भिरवंडे ही बसफेरी अद्यापही पूर्ववत सुरु झालेली नाही. याबाबत भिरवंडे ग्रामस्थांनी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या पुढाकाराने विभाग नियंत्रकांची भेट घेत लक्ष वेधले. त्यावर विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सोमवारपासून ही एसटी फेरी सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती गोट्या सावंत यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे, सदर बस भिरवंडे गावाबरोबरच सांगवे , कनेडी , नाटळ . हरकुळ आदी गावांतील विद्यार्थी , नोकरदार वर्ग , सर्वसामान्य नागरिक यांना कणकवलीहून सायंकाळी घरी पोहोचण्याचे एकमेव माध्यम आहे. सध्या सदर बसफेरी सुरु नसल्यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . महाविद्यालयीन विद्यार्थी नोकरदार प्रवासी वर्ग यांना आपले कामकाजाचे वेळापत्रक सांभाळून घर गाठणे अडचणीचे होत आहे व नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. यावर प्रकाश रसाळ यांनी सोमवारपासून ही एसटी फेरी सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली.
यावेळी पुनाळ वकल समाज उन्नती मंडळ भिरवंडे चे पदाधिकारी व रमेश सावंत, सहदेव सावंत, सतीश सावंत, प्रकाश मराठे, श्रीकांत सावंत, विजय सावंत आदी उपस्थित होते.