*कोकण Express*
*तुतारी गाडीचा थांबा नांदगाव रेल्वे स्टेशनला पूर्ववत करण्याची मागणी*
*रत्नागिरी येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घेतली भेट*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानक म्हणजे मध्यवर्ती असून नांदगाव दशक्रोशितील नागरिक बरोबरच देवगड तालुका तसेच फोंडाघाट परिसर यांना जवळचे रेल्वेस्थानक आहे. यामुळे सुरुवातीला नांदगाव स्टेशनला तुतारी गाडीचा थांबा होता. मात्र कोरोना काळात सर्व ठप्प झाल्याने यावेळी तुजला गाडीचा थांबा कमी करण्यात आला होता. तो थांबा पुन्हा पुर्ववत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज रत्नागिरीत आलेल्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नांदगाव रेल्वे स्थानक मधील रिक्षा संघटनेच्या वतीने ही दानवे यांच्या जवळ लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. रिक्षा संघटनेच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की देवगड व फोंडाघाट, नांदगाव परीसरातील चाकरमान्यांना येथे तुतारी गाडीचा थांबा नसल्याने भाडे भार जास्त होतो तसेच तेथील रिक्षा चालक त्यांचा व्यवसाय धोक्यात आहे, या गाडीने उतरणारे प्रवासी दाजीपूर, फोंडा, देवगड ,आणि आजूबाजूचे गाव आज या सर्वांची हेळसांड होत आहे, तसेच लहान सहान दुकान बंद आहेत. या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपण ही आमची हक्काची गाडी जी पूर्वी नांदगाव स्टेशनला थांबत होती तिचा पुन्हा एकदा थांबा पूर्ववत करावा. अशी आमची कळकळीची मागणी असल्याचे रिक्षा संघटनेच्या वतीने शेवटी नमुद केले आहे .
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार,अमृत चौगुले, रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर तसेच नांदगाव रेल्वे स्थानक मधील रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.