*कोकण Express*
*गणपती साना ते कलेश्वर मंदिर कलमठ येथील जानवली नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ*
*संदेश पारकर यांच्या मागणीला यश…!*
*पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांना दिलेला शब्द पाळला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसरात पावसाचे पाणी येवुन पुर आला होता. यामुळे शेती, घरे, दुकाने, हॉटेल्स, वाहने, छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे खूप नुकसान झाले होते. तसेच गेली कित्येक वर्षे जानवली नदीमधील गाळ न काढल्याने नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर जाणवली नदी पात्रातील गाळ काढन्याचे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कालच केली होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी आजपासूनच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले होते. ते आश्वासन आज पालकमंत्री महोदयांनी पुर्ण केले. आज प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कणकवली शहर गणपती साना येथुन करण्यात आला. यावेळी संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाचे विशेष आभार मानले. यावेळी महिला जिल्हा संघटक निलम सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, वैभव मालांडकर, प्रथमेश परब, प्रशांत गवळी, दिलीप मालंडकर, धोंडी आरोलकर, बाबु केनी आदी उपस्थित होते.