*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा वर्गाने सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवात सहभागी व्हावे – अविनाश पराडकर यांचे आवाहन*
*दिनांक २१ ते २३ मे २०२२ या कालावधीत होतकरू युवावर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी कणकवलीत एमएसएमईमार्फत होत आहे आयोजन*
कोकणचे सुपुत्र असलेले केंद्रीय मंत्री माननीय नारायणराव राणे यांनी केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्या दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. आपल्या जिल्ह्यातील युवावर्गाने वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला गवसणी घालावी यासाठी त्यांची तळमळ आहे. नोकरीचा ठसा इथल्या जीवनमानावर असल्याने उद्योग करताना योजना प्रस्ताव ते बँक फायनान्सपर्यंत अनेक अडचणी येतात. नेमके काय करायचे याची कल्पना जिल्ह्यातील युवाईला नसल्याची जाणीव राणेसाहेबांना असल्याने सातत्याने त्या दिशेने त्यांनी पाठपुरावा केला आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांना प्रबोधनाच्या कामगिरीवर नेमले आहे. जिल्ह्यातील होतकरू युवावर्ग व नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मिशन आत्मनिर्भर संयोजक अविनाश पराडकर यांनी केले आहे.
दिनांक २१ मे २०२२ पासून ते २३ मे २०२२ पर्यंत कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर भाजपा कार्यालयासमोरच्या विशाल मंडपात होणारा हा महोत्सव त्यादृष्टीने फार महत्वाचा आहे. मनोरंजन नव्हे तर अर्थकारणातून आयुष्य बदलण्याची संधी जिल्ह्यातील तरुण वर्गाला त्यातून मिळणार आहे. यावेळी राजकारण बाजूला ठेवत प्रत्येकाने भेट दिलीच पाहीजे असा हा उपक्रम आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोकण भागातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे. विविध कार्यशाळांमधून होतकरू तरुणांसाठी बँक लोन मेळावा, कोकणातील उद्योजकांना सरकारी कंपन्यांसोबत टायप करण्याची संधी, एक्स्पोर्ट प्रमोशन, उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी व झेड कॅम्प, मार्केटिंग व सेल्समनशीप कार्यशाळा, GeM नोंदणी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वयंरोजगाराचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात मिळणार आहे. थोडक्यात, भविष्यातील परिस्थितीचा वेध घेत नोकरीच्या मानसिकतेतून जिल्ह्यातील युवा वर्गाला बाहेर काढत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीचा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आयुष्यातले तीन दिवस आयुष्य बदलून टाकणारे ठरतील. फक्त ते गांभीर्य आणि त्यासाठीची जिद्द तुमच्याकडे हवी. संधी तुमची वाट पहात आहे असे आवाहन श्री अविनाश पराडकर यांनी केले आहे.