*कोकण Express*
*जिल्ह्याचे अडीचशे कोटींचे बजेट १४० कोटींवर*
*सिंधुदुर्गचा विकास करण्यात शिवेसना अपयशी…*
*भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेल्या वर्षभरात सिंधुदुर्गचा विकास करण्यात शिवसेना पक्ष पूर्ण अपयशी ठरला आहे. जिल्ह्याचे अडीचशे कोटींचे बजेट १४० कोटींवर आले. डॉक्टरांची रिक्तपदे असल्याने आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर आहे. तर एस.टी.चे ३०० चालक मुंबईला पाठविल्याने एस.टी.सेवा कोलमडली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य जिल्हावासीयांना होत असेल तर सत्तेत असून शिवसेनेचा उपयोग तरी काय? असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज उपस्थित केला.
श्री.तेली यांनी कणकवली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा शिवसेनेचे आमदार, खासदार करत आहेत. हे खरे असेल आणि शिवसेनेने खरोखरच जिल्ह्याचा विकास केला असेल तर जिल्हा बँकेसह इतर स्थानिक पातळीवरील निवडणुका लढविण्यासाठी आघाडी कशाला करता. स्वबळावर निवडणूक लढवून भाजपशी मुकाबला करा.
ते म्हणाले, शासनाने शासकीय मेडिकल कॉलेजसाठी एक हजार कोटींची तरतूद केल्याची फुशारकी शिवसेना नेते मारत आहे. मात्र निवडणुकीपूर्वी याच नेत्यांची मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलसह अन्य विकासकामांची भूमिपूजने केली. त्यांचे पुढे काय झाले याचेही उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.
दरम्यान सिंधुदुर्ग एस.टी.विभागातील ३०० चालक मुुंबईला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील एस.टी.सेवा कोलमडली आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी एस.टी.बसेस उपलब्ध नाहीत. पुढील आठवडाभरात ग्रामीण भागातील सर्व एस.टी.फेर्या सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्री.तेली यांनी दिला. तसेच माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना भाजप पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच रत्नागिरीत पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तर सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली असेही श्री.तेली म्हणाले.