*कोकण Express*
*संभाजी राजेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली नव्या संघटनेची घोषणा*
आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी 12 मे रोजी आपली नवी दिशा ठरवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.
मी निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 42 मताचा कोशंत पूर्ण करावा लागेल, 28 मत शिल्लक आहेत …आता राजकीय पक्षांनी ठरवावं. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावं. आपण मला राज्यसभेत पाठवावं म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये.
दुसरी घोषणा अशी की, स्वराज्य नावाची आपण संघटना स्थापन करत आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना एका छता खाली आणायचा प्रयत्न आहे, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, अन्याय होत असेल तिथे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज, शाहु महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं.
या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, गोंदिया जिल्हा सोडला तर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला कोरडा दुष्काळ ,कामगारांचे प्रश्न ,विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला विनंती केली आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं महणून ते पद स्वीकारलं.