*कोकण Express*
*नवोदय परीक्षेला बसणाऱ्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सुजित जाधव यांच्याकडून पर्दाफाश*
*संबंधीत शाळांवर कारवाई साठी करणार तक्रार*
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचा इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तीन शाळांमध्ये नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी परजिल्हयातील पाल्यांचा पाचवीच्या वर्गात खोटा प्रवेश दाखवून परजिल्हयातील पालकांनी शाळांना हाताशी धरून शक्कल लढवून आपल्या पाल्ल्यांना प्रवेश परिक्षेला बसविण्याचा प्रकार होत असताना असे विद्यार्थी परिक्षेला बसण्यापूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांसह सोमवारी शाळांना प्रत्यक्ष भेट देत हा प्रकार उघड केला. यावेळी तालुक्यातील तीन शाळांमध्ये एकूण ३४ विद्यार्थी अशाप्रकारे बसलेले असताना संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी यांच्याशी भेट घेऊन सदर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रावर सही देऊ नये अशी भूमिका घेत सह्या झाल्यास संबंधित शाळांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री, शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर सही न देण्याची शाळांनी भूमिका घेतली असून याबाबत सहावीच्या प्रवेशासाठी शनिवारी दि. ३० एप्रिल २०२२ रोजी कणकवली केंद्रावर होणा-या परिक्षे दरम्यान शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित राहून अशा विद्यार्थ्यांच्या पालकांवर कारवाई व्हावी यासाठी प्रवेश पत्र दाखवूनच परिक्षेसाठी प्रवेश देणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी सांगितले.
सध्या नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी होणा-या परिक्षेसाठी कणकवली तालुक्यातून २३० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत यामध्ये स्थानिक १९५ विद्यार्थी बसणार आहेत. तर तीन शाळांमध्ये परजिल्हयातील ३४ विद्यार्थी बोगस प्रवेश दाखवून परिक्षेला बसणार असल्याचे पुढे आले आहे. तशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, कासार्डे विभागप्रमुख बबन मुणगेकर, उपविभागप्रमुख प्रथमेश खटावकर, शाखाप्रमुख योगेश मुद्राळे, पिसे, रोहित ठाकूर, रोहित जाधव, समीर मुणगेकर, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे आदी उपस्थित होते. दरम्यान नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या या बोगस प्रवेशाचा आधार घेत जिल्हयातील मुलांना नवोदय विद्यालयापासून वंचित ठेवणाऱ्या या जिल्ह्यातील शाळा व त्यांचे पालक यांच्यावर नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष हे कारवाई करणार आहेत की नाहीत असा सवाल आता जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर अशा प्रकारे जिल्हयातील शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखविण्यामागे परिजिल्हयातील काही शिक्षण अकॅडमींचा सहभाग असून पालकांकडून ४० ते ५० हजार रूपये घेऊन या अकॅडमी जिल्हयातील शाळांमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाचवीत व आठवीत प्रवेश दाखवून पालकांचीही आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यामुळे कणकवली तालुक्यासह जिल्हयातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोमवारी सुजित जाधव यांनी संबंधित शाळांना भेटी देत सर्व नियम व कागदपत्र संबंधित शाळा मुख्याध्यापकांना सादर करीत असा प्रकार थांबवण्याची विनंती करून सदर ३४ विद्यार्थ्यांना आपल्या सहीने प्रवेश पत्र देऊ नये अशी विनंती केली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे जिल्हयातील काही शाळांमध्ये पाचवीत बोगस प्रवेश दाखवून नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेश परिक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना काही परिजिल्हयातील पालकांनी बसविले होते. तसेच असे विदयार्थी तिसरी व चौथीमध्ये जिल्हयातील शाळांमध्ये नसताना जिल्ह्यातील काही शाळा फक्त पाचवीत बसवून अशा विद्यार्थ्यांना नवोदय परिक्षेपूरते प्रवेश देत असल्याची गंभीर बाब पुढे आल्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. तरी यावर नवोदय विद्यालय समिती, शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून अशा विद्यार्थांना नियमानुसार परीक्षेला बसू देऊ नये असे सुजित जाधव यांनी सांगत ही बाब वरीष्ठ पातळीवर घेऊन जात जिल्हयातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करणार असल्याचे सांगितले आहे.
येत्या शनिवारी ३० एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्रावर नवोदय विद्यालयाच्या सहावीच्या प्रवेशासाठी परीक्षा होणार असून परजिल्हयातील ३४ विद्यार्थी या परिक्षेला बसणार असल्याने या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या सहीने प्रवेश पत्र देऊ नये असे सांगितले आहे. मात्र याबाबत हे विद्यार्थी परिक्षा केंद्रावर आल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी व परजिल्हयातील विद्यार्थी यांचे शिवसेना व युवासेना जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्रावर प्रवेशपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र तरीही परजिल्ह्यातील विद्यार्थी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीचे प्रवेशपत्र घेऊन परिक्षाकेंद्रावर आढळल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकमंत्री व मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी दिली आहे.