‘सेतू’ कार्यालयांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, नागरिकांचा होणार फायदा

‘सेतू’ कार्यालयांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, नागरिकांचा होणार फायदा

*कोकण Express*

*‘सेतू’ कार्यालयांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, नागरिकांचा होणार फायदा..!*

तहसील कार्यालय.. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाचे केंद्र.. या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे एकाच छताखाली सहज मिळत. त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी ही केंद्रे खऱ्या अर्थाने सुविधा कार्यालये ठरली होती.

दरम्यान, मागील काही काळापासून राज्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे विविध दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात हाल आहेत. एका एका कागदासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही बाब काॅंग्रेसचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले, की “टेंडरची मुदत संपल्याने 31 डिसेंबरपासून राज्यातील सेतू सुविधा केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.”

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन ही ‘सेतू सुविधा केंद्रे’ तातडीने सुरू करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

लवकरच टेंडर प्रक्रिया
आमदार धीरज देशमुख यांच्या प्रश्नाला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उत्तर दिले. राज्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु केली जातील. त्यासाठी लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली..

दरम्यान, सेतू कार्यालये बंद असल्याने नागरिकांची होणारी अडचण सरकारसमोर मांडली. राज्यमंत्री भरणे यांनी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील सेतू सुविधा केंद्रे लवकरच सुरु होतील. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सरकारचा हा निर्णय दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया आमदार देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!