मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते मग आंगणेवाडी यात्रेला निर्बंध का?

मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते मग आंगणेवाडी यात्रेला निर्बंध का?

*कोकण Express*

*मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते मग आंगणेवाडी यात्रेला निर्बंध का?*

*यात्रेपूर्वी आंगणेवाडीत बैठक न घेणारा पहिलाच पालकमंत्री ; मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका*

*सिंधुदुर्ग :*

 पर्यटन मंत्र्यांचा दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी, प्रशासन व पोलिसांचा फैजफाटा पालकमंत्र्यांना चालतो. मात्र आंगणेवाडी यात्रेवर हेच पालकमंत्री कोरोनाचे कारण सांगून निर्बंध घालतात. जनतेला वेठीस धरून राज्यातील सत्ताधारी आपल्याला हवा तसा कोरोनाच्या वापर करत आहेत का? असा परखड सवाल मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

आंगणेवाडी यात्रेबाबत कोणतीही आस्था या पालकमंत्र्यांना नाही. त्यामुळे यात्रा नियोजन बैठकही त्यांनी आंगणेवाडीत घेतली नाही, आंगणेवाडी यात्रेपूर्वी नियोजन बैठक आंगणेवाडीत न घेणारा पहिलाच पालकमंत्री आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ, प्रशासन, व्यापारी यांच्यासोबत आंगणेवाडीत अथवा मालवण तालुक्यात बैठक घेऊन जनमत जाणून घेणे गरजेचे असताना तसे न करता कुडाळ येथे स्वतःच्या सोयीने बैठक घेऊन हुकूमशाही पद्धतीने पालकमंत्री यांनी यात्रेवर निर्बंध लादले.

राज्यातील बडे मंत्री कोरोना नियंत्रणात आला असे सांगतात. सर्व ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी एकेरी संख्येत आली. सर्व जिल्ह्यात तीच दिलासादायक स्थिती असताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री कोरोना भीती घालून यात्रेवर निर्बंध का घालतात? असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

एकूणच सिंधुदुर्गातील जनतेबद्दलच कोणतीही आपुलकी या पालकमंत्र्यांना नाही. मंत्रिपदाचा मेवा खायचा आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसायचे काम सत्ताधारी करत आहेत. अशीही टीका उपरकर यांनी केली.

मंदिर परिसरात एकाचवेळी भाविकांची गर्दी होणार नाही यादृष्टीने आंगणेवाडी ग्रामस्थ व प्रशासनाने नियोजन केले आहे. दरवर्षी आदर्शवत व नियोजनबद्ध यात्रोत्सव अशी आंगणेवाडी उत्सवाची ख्याती आहे. गतवर्षी कोरोना स्थितीतमुळे निर्बध कडक होते. त्यावेळी सर्वांनी सहकार्य केले. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याची स्थिती आकडेवारीवरून स्पष्ट होत असताना कोरोना निर्बंध यात्रा उत्सवांवर घालण्यात आले आहेत.

मास्क वापर व एकाच वेळी मंदिरात मोठी गर्दी व्हायला नको. या गोष्टींचे पालन व्हावे मात्र पूर्ण यात्रेवर निर्बंध दुकान संख्येवर निर्बंध, हे नेमके काय चाललंय? आंगणेवाडी यात्रा परिसर खूप मोठा आहे. अगदी लांब लांब दुकाने असतात. छोटे मोठे व्यापारी तसेच परिसरातील ग्रामस्थांना रोजगार मिळतो. मात्र वस्तुस्थिती पाहणी न करता यात्रेवर निर्बंध घातले गेल्याने मोठा परिणाम आर्थिक उलाढाल व रोजीरोटी तसेच रोजगारावर होणार आहे. जनतेशी देणेघेणे नसलेल्या शिवसेना पालकमंत्र्यांकडून यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करणार. असेही उपरकर म्हणाले.

शिवसेनेकडून अपयश लपवण्याचा प्रयत्न..
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. काही किरकोळ कर्मचारी हजर असले तरी जिल्ह्यातील शेकडो बसफेऱ्या बंद आहेत. आंगणेवाडी यात्रेत भाविकांसाठी दरवर्षी विविध मार्गांवरून सुटणाऱ्या बसफेऱ्या यावर्षी कश्या सुटणार हा प्रश्न आहे अश्या स्थितीत यात्रा पूर्ण क्षमतेने झाली तर एसटीचे काय? हा प्रश्न जनतेने विचारल्यास? आपले अपयश दिसू नये यासाठी यात्रेवर निर्बंध घालण्याचा शिवसेनेचा पडद्यामागील डाव तर नाही ना? असाही सवाल उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!