*कोकण Express*
*छात्रभारतीची वैचारिक शिवजयंती..*
*गोविंद पानसरे लिखित ‘कोण होता शिवाजी?’ हे ५ लाख शिवचरित्र घराघरात पोहोचविण्याचा संकल्प*
*छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिवरायांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या ५ लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.
देशात एकीकडे शाळा- कॉलेजांमध्ये धर्मांध शक्ती द्वेषाचं वातावरण पेटवत आहेत. म्हणून अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन एकतेची प्रेरणा देणारे लोककल्याण राजा छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्येक विद्यार्थी-तरुणांच्या मनामनात-घराघरात पोहचवण्याची गरज आहे. आदर्शवत राजा, आदर्शवत राज्य, आदर्शवत प्रशासन, आदर्शवत शासन कसे असावे? जनकल्याणकारी राज्याची संकल्पना काय आहे हे नव्या पिढीच्या समोर आले पाहिजे हा प्रयत्न यामागे आहे.
या प्रयत्नाचा भाग म्हणून शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ” शिवाजी कोण होता?” हे पुस्तक ५ लाख विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला आहे. केवळ पुस्तक वाटपच नव्हे तर हे पुस्तक मुलांनी वाचावे यासाठी सदर पुस्तकावर निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही श्री ढाले यांनी सांगितले.