*कोकण Express
*महाविकास आघाडी सरकारने “पिकेल ते विकेल” ही योजना चोरुन सुरु केली…*
*अतुल काळसेकर; नीलक्रांती पुस्तकाचे शनिवारी गुहागरमध्ये झाले प्रकाशन..*
*सिंधुदुर्ग,ता.२३:*
महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील वन डिस्टिक वन प्रोडक्ट, महिला व बचत गट गटशेती योजना,फळ उत्पादन योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, व्हेंचर कॅपिटल अशा सहा योजना एकत्रित करून त्या योजनेला विकेल ते पिकेल असे नाव दिले आहे.प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतील या योजना असल्याने राज्य सरकारने किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाचा उल्लेख या योजनांमध्ये करणे आवश्यक होते.प्रधानमंत्री आत्मनिर्भर ही केंद्राची योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे . या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारत मधुनच देण्यात येणार आहेत , असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले.
रत्नागिरी व गुहागरमध्ये त्यांनी लिहिलेल्या नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले . त्यावेळी ते बोलत होते.या पुस्तिकेचे प्रकाशन जागतिक मत्स्यदिनाच्या निमित्ताने गुहागरमध्ये भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष डॉ . विनय नातू ,दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन, राजीव किर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत , रामदास राणे , जिल्हा कोषाध्यक्ष आशिष जोगळेकर , धनगर आघाडीचे प्रदेश समन्वयक ड . मिलिंद जाडकर , तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि सिंधु आत्मनिर्भर अभियानचे संयोजन अतुल काळसेकर यांनी नीलक्रांती नावाची पुस्तिका लिहिली आहे . या पुस्तिकेमध्ये मच्छीमार , शेतकरी यांच्यासाठी असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२०-२५ ची संपूर्ण माहिती आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ आत्मनिर्भर भारत ‘ अभियान सुरू केले असून , याअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर केली आहे . त्याचा फायदा कोकणातील छोट्या मच्छीमारांनाही होणार आहे . त्यातून मच्छीमार सक्षम होणार आहेत , मदत झाली असल्याचे ‘ आत्मनिर्भर भारत ‘ योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी सांगितले.
२० हजार ५० कोटी रकमेची योजना या योजनेचा प्रचार , प्रसार करण्यासाठी भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे . २० हजार ५० कोटी रुपये रकमेची ही योजना भारतातील खारे , नीमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन , त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व सशक्त अर्थकारण यासाठी दिशादर्शक असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.