*कोकण Express*
*माझ्या विरोधात आमदारकीची स्वप्ने पाहणार्यांना साधी महीला सुध्दा पाडू शकते…*
*दिपक केसरकरांचा टोला; दहशतवाद नाकारला म्हणून देवगड, कुडाळची सत्ता विरोधकांकडुन गेली…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माझ्या विरोधात आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांची माझ्या समोर उभ राहण्याची सुद्धा साधी लायकी नाही. त्यांचा पराभव एक साधी महीला सुध्दा करु शकते, असा टोला माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे लगावला. दरम्यान याठीकाणी दहशतवाद होता म्हणून कुडाळ आणि देवगड येथील विरोधकांची सत्ता गेली. तेथील जनतेते त्यांना योग्य ती जागा दाखवून दिली. मात्र आम्ही आमच्या झालेल्या पराभवाचे नक्कीच आत्मचिंतन करू, लोकांनी दिलेला कौल मला मान्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते. श्री. केसरकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मोठी लोकसंख्या असलेली नगरे आमच्या ताब्यात आली आहेत. तर किरकोळ लोकसंख्या असलेल्या शहरात धनशक्तीचा प्रभाव पडला. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाला विजय मिळाला, असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरात उद्भवणारा पाणीटंचाईचा प्रश्न येणाऱ्या काळात सोडवला जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असून पुढील काळात शहराला दीड लाख लिटर, तर कोलगावला पाच लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. तर शहरात होणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी पंचवीस कोटी पेक्षा जास्त निधीची तरतूद केली जाणार आहे. दरम्यान सावंतवाडी शहर पुन्हा एक नंबर वर आणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी शहर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात उत्कृष्ट प्रोजेक्ट मी राबविले आहेत. त्याचा फायदा येथील नागरिकांना होत आहे. भविष्यात सुद्धा सावंतवाडीचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.