*कोकण Express*
*…..तर त्यांनी पालकमंत्री पद सोडायला हवे ; दया मेस्त्री*
*पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा स्वाभिमान आणि नागरिकांचा अभिमान गमावला*
*कणकवली : मयुर ठाकूर*
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्यात आली. यात सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांच्या बंगल्याचे नाव सिंधूरत्न असे करण्यात आले आहे. वास्तविक हे नाव सिंधुदुर्ग असे असायला हवे होते. मात्र सिंधुदुर्ग असे नाव बंगल्या देण्यास जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कमीपणा वाटला का? पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा स्वाभिमान आणि नागरिकांचा अभिमान गमावला असल्याचे मनसेचे उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हंटले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्यात आली.
या नावांमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या बंगल्याचे नाव सिंधुरत्न करण्यात आले आहे. वास्तविक या नावाने कोणताही किल्ला नाही. या जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री सामंत यांना जिल्ह्याच्या अभिमान, स्वाभिमान वाढवायचा असेल तर त्यानी किल्ल्याचे नाव बंगल्याला द्यायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा समन्वय साधत नाव दिले आहे. ज्या नावाने कोणता किल्ला नाही ते नाव देण्यामागचा उद्देश काय ? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देण्यास कमीपणा वाटतो का त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्हाबद्दल त्यांना अभिमान असायला हवा. तसे नसेल तर त्यांनी पालकमंत्री पद सोडायला हवे असे श्री मेस्त्री यांनी म्हटले आहे.