*कोकण Express*
*धनशक्तीमुळे नव्हे तर आमच्या टीमवर्कमुळे जिल्हा बँक जिंकलो ;अतुल काळसेकर*
*राज्य शासनाने खावटी कर्जमाफी मुद्दाम रोखलीय…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने धनशक्तीमुळे नाही तर टीमवर्कमुळे विजय मिळविला आहे. पोलिस आणि प्रशासन यांना आम्ही पुरून उरलो असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी आज येथे केले. तसेच सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची खावटी कर्जमाफी राज्य शासनाने रोखून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
येथील भाजप कार्यालयात श्री.काळसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, सरचिटणीस प्रसन्न उर्फ बाळू देसाई उपस्थित होते. श्री.काळसेकर म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने पोलिस आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रचंड दबाव आणला. पण आमचे कार्यकर्ते भिडले, या सर्वांना पुरून उरले आणि जिल्हा बँकेत विजयश्री खेचून आणली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि टीमवर्कचा हा विजय आहे.
दरम्यान जिल्ह्यातील खावटी कर्जदारांना राज्य शासनाने कर्ज माफी योजनेतून वगळले होते. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खावटी कर्जदारांनाही कर्जमाफी मंजूर झाली. त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला. कर्जदारांची यादी निश्चित झाली. फक्त ऑडिटचे काम शिल्लक असताना राज्यात सत्ता बदल झाला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ऑडीटचेही काम पूर्ण झाले. त्यामुळे तत्कालीन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश यांनी सरकारकडे पाठपुरावा करून खावटी कर्जदारांना कर्जमाफी मिळवून द्यायला पाहिजे होते. पण ते त्यांना शक्य झाले नाही. तसेच खावटी कर्जदारांना कर्जमाफी झाली तर त्याचे श्रेय भाजपला जाईल. म्हणून राज्यातील महाविकास आघाडीने मुद्दामहून ही कर्जमाफी रोखली असल्याचा आरोप अतुल काळसेकर यांनी केला.