*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न*
*जात नावाच्या विषमतेचा वृक्ष उखडून टाकण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले ; प्रा. विनोदसिंह पाटील*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. 6 डिसेंबर हा दिवस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिन म्हणून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विनोद पाटील बोलत होते. जगामध्ये जात नावाचा विषमतेचा वृक्ष आहे. तो मुळासकट उखडून टाकण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले यांनी संपूर्ण जीवन काळातील कार्य समतेसाठी केले. जगातील प्रत्येक मानव घटकात विषमता भरलेली आहे. ती घालून टाकण्यासाठी त्यांनी केलेले काम हे कालातीत आहे. अनेक रोगांवर अनेक लसी येतात परंतु समता नावाची लस आली तर माणुसकीमध्ये अडचण येणारे अनेक रोग बरे होतील. डॉ. बाबासाहेब हे जागतिक समतेचे प्रणेते होते. म्हणून कोलंबिया या राष्ट्राने समता दिन साजरा करण्याचे ठरवले. समतेने वागायचे की समानता प्रस्थापित करायची हे ठरवले पाहिजे. राज्यघटनेमुळे राजकीय समानता मिळाली तरी सामाजिक व आर्थिक समानता मिळालेली नाही. आणि ती जर मिळाली नाही तर लोकशाही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आणि मागील वीस वर्षात त्याचे दर्शन आपल्याला होत आहे. हे स्पष्ट दिसते. सामाजिक दडपशाहीविरुद्ध लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले यात कोठेही भावना नव्हती तर समता होती. असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना आज अवघं जग अभिवादन करत आहे. अवघे जग यांच्या विचारांना नतमस्तक होते यावरून त्यांच्या विचारांची खोली दिसून येते. त्यांचे विचार समकालीन कसे उपयोगी आहेत याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी असणारे विविध असणाऱ्या भारतासारख्या देशाला एकत्र ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांचे अविरत व अपार कष्टाचे फळ म्हणजे संविधान आहे. ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कारण ते खंबीरपणे मांडलेले आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना डॉ. संतोष रायबोले यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पैलू सांगत सूत्रसंचालनात बहार आणली तर आभार डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.