*कोकण Express*
*…आणि पन्नास वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांची शाळा भरली निसर्गाच्या सानिध्यात…*
*एस.एम.हायस्कूल कणकवलीच्या दहावीच्या १९८५-८६ च्या बॅचचे गेट टुगेदर रंगले तळाशील,तोंडवळी समुद्र किनारी*
*कासार्डे ः संजय भोसले*
एस.एम.हायस्कूल कणकवली दहावीच्या सन १९८५-८६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल पस्तीस वर्षांनी गेट टुगेदर रंगले….आणि शाळा भरली निसर्गाच्या सानिध्यात… तळाशील,तोंडवळी समुद्र किनारी.दोन दिवसांचे गेट टुगेदर ठरले चांगलेच यादगार .
धावपळीच्या जगामध्ये जवळजवळ साडेतीन दशकानंतर आपल्या मित्र मैत्रिणींना एकत्र आणून या पन्नास वर्षावरील वयोगटातील विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरवायची ही कल्पना डोक्यात येणे आणि तीला वास्तवात मूर्त रूप देणे हे एक साकारलेले स्वप्न म्हणावे लागेल.आपल्या बॅचमधील सर्व मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर शोधून काढणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, एवढेच नव्हे तर गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या नियोजनापासून आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत ती पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणे महत्त्वाचे होते. सूर्यकांत याने तर एखाद्याशी संपर्क होत नसल्यास त्यांच्या घरी जाणे पर्यंत प्रयत्न करून जास्तीत जास्त मित्र मंडळी उपस्थित राहण्यासाठी आग्रही राहिला आणि मित्र-मैत्रिणींची कार्यक्रमातील उपस्थिती संख्या चाळीस पर्यंत पोहोचली.आपल्या मित्र-मैत्रिणींना चांगला दर्जेदार कार्यक्रम देता यावा,सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले.
सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादा गट किंवा संघटना अस्तित्वात यावी लागते.अस्तित्वात आल्यानंतर ते सांभाळणे आणि टिकवणे हे मोठे कौशल्याचे काम असते. प्रत्येकाचे आचार विचार ,वैचारिक पातळी, अपेक्षा या भिन्न भिन्न असू शकतात.सर्वांना सांभाळून हे करत असताना नियोजन कर्त्यांना आपला वैयक्तिक वेळ आणि शारीरिक योगदान द्यावे लागते. प्रसंगी स्वतःची पदरमोड करावी लागते.विशेष बाब म्हणजे नियोजनकर्त्यां मध्ये कोणताही मोठेपणाचा लवलेश नव्हता. एवढे सर्व करूनही प्रसन्न मुद्रेने हे सर्वजण वावरत होते.प्रत्येक मित्र-मैत्रिणींची अगदी आदराने, आपुलकीने , प्रेमभावनेने चौकशी करत होते, त्यांना सेवा देण्यात व्यस्त होते.काही मित्रमंडळी मुंबईहून आली होती त्यांना स्टेशन वरून घेऊन कार्यक्रम स्थळी आणणे आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांना स्टेशनला
नेऊन ट्रेनमध्ये बसविण्याची चोख व्यवस्था केली होती.कार्यक्रम स्थळी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.विशेषता महिलांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.चहा,नाश्ता,जेवण यामध्येही वैविध्यता ठेवण्यात आली होती.
पहिल्या दिवसाची सुरुवात संतोष पेटकर यांनी राष्ट्रगीताने वर्ग भरवला.सरस्वती प्रतिमेचे पूजन झाल्यावरती केक कापण्यात आला. तब्बल ३५ वर्षानंतर एकत्र आल्यामुळे आणि बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कापासून दूर असल्याने प्रत्येकाला स्वतःची ओळख सांगण्या वाचून पर्याय नव्हता. ओळख परेडला डान्स मास्टर संतोष पेटकर यांने सुरुवात केली. खरं म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणींची वास्तवता जाणण्याचा हा खटाटोप होता.प्रत्येक जण आपल्या परीने जीवनात स्थिरस्थावर झालेला आहे. कोण व्यावसायिक, कोण वकील ,कोण इंजिनियर ,कोण प्राध्यापक तर कोण शेतकरी.. सर्व काही समजत होते पण त्याही पलीकडे जाऊन एका मैत्रिणीने तिच्या मनात दु:खाच्या तीव्र वेदना खोलवर कोरल्या गेल्या असूनही आपल्या बोलक्या स्वभावाने इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे हे वास्तव यानिमित्ताने सर्वांना समजले. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या सुख दुःखात सामील होणे आणि एकी आहे ती टिकवणे हेच होते.शेवटी विनोदाचा बादशहा विलास खानोलकर याने आपल्या नेहमीच्या ओघवत्या शैलीत चौकार षटकार मारत आपली वेगळी ओळख करून दिली.जेवणाची मधली सुट्टी झाली आणि हे पहिले सत्र कधी संपले ते सर्वांना कळलेही नाही.
सुरुची बाग ,स्वच्छ समुद्र किनाऱ्यावरून वाळूतून गप्पागोष्टी मारत फिरण्याचा आनंद , सूर्यास्ताचे निरीक्षण आणि फोटो घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वजण आनंदाने घेत होते.
आपण सर्वजण पन्नाशी पार केलेले आपल्या संसारात, नोकरीत, व्यवसायात प्रपंचात गुंतलेलो प्रत्येकाची सुखदुःखे वेगळीच असतात.रात्री आठ वाजल्यापासूनच्या करावके कार्यक्रमात हे सर्व विसरून एक दिवस का असेना या कार्यक्रमात सर्वजण तल्लीन झाले होते.संतोष पेटकर आणि विलास खानोलकर हे दोन उपजत कलाकार असलेल्या दोन रत्नांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने कार्यक्रमाला अधिक रंगत आली.जवळ जवळ पाच तासाच्या मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांना भारावून सोडले.गाणी, डान्स ,विनोद ,काव्य ,मिमिक्री सर्व कार्यक्रमाचा यासाठी साऊंड सिस्टिमचे व्यवस्था पाहणारे दयानंद पेडणेकर यांचीही साथ लाभली.रजनी साटविलकर, शोभा मेस्त्री, मनिषा काणेकर, मंगेश जाधव, महेंद्र सांब्रेकर आणि विशेष करून अॅड. सुनील खोचरे गेली पस्तीस वर्षे या कार्यक्रमाची वाट पाहत होते. या संधीचे सोने करत शक्य तेवढी गाणी म्हणण्याचा प्रयत्न केला.या गाण्याच्या तालावर सर्वच मित्रमैत्रिणीं मनोसोक्तपणे या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी सर्वांनाच आपण अजून एक दिवस तरी एकत्र थांबलो पाहिजे होतो असे वाटत होते.पण नियोजनाप्रमाणे निघावे तर लागणार होते.सर्वांची मने भरून आली.पुन्हा एकदा पुढच्या वर्षी असाच वर्ग भरवण्याचा निश्चय करून सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झाले.
यामध्ये प्रामुख्याने संध्या पाटकर,सविता तेंडोलकर,निता कडूलकर,भरती खोत,शोभा मेस्त्री, मनिषा काणेकर,रजनी साटविलकर ,सुजाता कदम,मनिषा लोंढे,नंदिनी पोरे,
संदीप तावडे,सुनील राणे,मंगेश जाधव,अॅड.सुनील खोचरे,राजेश कुलकर्णी,राजेश मोरे,सूर्यकांत जाधव,विलास खानोलकर,प्रमोद जोशी, श्रीराम पालव, प्रा.नारायण राणे,सुशील पारकर,महेंद्र सांब्रेकर,दीपक राणे,मुकेश पटेल,संतोष गावकर,रामनाथ सावंत,दिनेश माणगावकर प्रकाश सावंत,प्रभात म्हापसेकर,शरद केळुसकर,विल्यम फर्नांडिस,संतोष पेटकर,सुनील सावंत,दौलत सावंत,राजेंद्र सावंत,संतोष साटम आदी मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.