*कोकण Express*
*सोनुर्ली बायेच्या चरणी भक्तीचे लोटांगण*
*पावसाचा व्यत्यय असूनही हजारो भाविकांनी केली नवसफेड*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सोनुर्ली माऊलीच्या जत्रौत्सवादिवशी सातत्याने पावसाचे विघ्न येऊनही कसलीही तमा न बाळगता हजारो भाविकांनी माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला. हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी भर पावसातही भाविक त्याच उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांची श्रद्धा व माऊलीची कृपेने अखेर निर्विघ्नपणे जत्रौत्सव संपन्न झाला. त्यानंतर आज तुलाभाराने जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला यावर्षी अवकाळी पावसाने विघ्न आणले. मात्र, दिवसभर पाऊस असतानाही आणि एसटीची सोय नसूनही दरवर्षीप्रमाणेच भाविकांचा जनसागर देवीच्या दर्शनाला लोटला होता. मंदिर परिसरात पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य पसरुनही न डगमगता व न कंटाळता भाविकांनी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभर अधून मधून पावसाची रिपरिप सुरू असतांनाही खाजगी वाहनाने भाविका सोनुर्लीत दाखल होत होते.
त्यानंतर रात्रौ साडेअकरानंतर देवी माऊलीचा कौल घेऊन मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन पूर्ण केली. तत्पूर्वी मांडावरून घंटा व वाद्यांच्या गजरात उत्सवमूर्ती पालखीतून आणली गेली. यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजीही करण्यात येत होती.
पालखी मंदिराकडे पोहोचताच लोटांगणाला सुरूवात झाली. यात हजारो भाविकांनी आपला लोटांगणाचा नवस फेडला. यात महिला भाविकांची संख्याही लक्षणीय होती. मंदिर परिसरात झालेला चिखल लक्षात घेता देवस्थान कमिटीकडून चोख व्यवस्था करित लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकाठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता.
पुरुष भाविकांची लोटांगणे पार पडताच महिलांची लोटांगणे झाली. जवळपास चार हजाराहून जास्त महिला व पुरुष भाविकांनी बाये चरणी लोटांगण अर्पण केले. सातत्याने पावसाचा व्यत्यय येऊनही यावेळी भाविकांचा उत्साह कायम होता. रात्री उशिरा स्थानिक दशावतार नाट्य मंडळाचे पौराणिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले.
रविवारी सकाळी गावातील गावकरी मंडळी व केळीकुळ आदींनी देवीच्या दर्शनासाठी व केळी नारळ ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर तुलाभार कार्यक्रम पार पडला. यावेळी तुला भराचा नवस बोललेल्या भाविकांनी आपली नवसफेड केली. तांदूळ गूळ साखर अन्नधान्य व इतर वस्तूंनी यावेळी तुलाभार करण्यात आला.
अखेर देवीच्या कौलाने जत्रौत्सवाची सांगता झाली.पावसाच्या व्यत्ययाने व्यापारावर परिणाम सोनुर्ली माऊलीच्या जत्रौत्सवादिवशी संपूर्ण दिवसभर पावसाची रिपरिप राहिल्यामुळे व्यापार व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून आला. मंदिर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे भाविकांनी खरेदीकडे लक्ष न देता दर्शन झाल्यानंतर आल्यापावली माघारी परतणे पसंत केले. त्यामुळे दरवर्षी होणारी हजारो रुपयांची उलाढाल काहीशी मंदावली. त्याचा व्यापार्यांना मोठा फटका बसला. दरवर्षी या जत्रा उत्सवासाठी येणाऱ्या हजारो भाविकांमुळे एसटीला लाखो रुपयांचा फायदा होतो मात्र एसटी बंदचा फटका यावर्षी महामंडळाला बसला.