*कोकण Express*
*◾मालवण बंदर जेटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी ५० लाख मंजूर*
*◾नव्या जेटीचे लोकार्पण पुढील महिन्यात ; आमदार वैभव नाईक यांची माहिती*
*मालवण ः प्रतिनिधी*
सुमारे १५ कोटी खर्चाच्या मालवण बंदर येथील नव्या जेटी टर्मिनलचे काम पूर्णत्वास आले आहे. जेटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून त्याला मान्यता मिळाली आहे. जिल्हा नियोजनमधून या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत या जेटी टर्मिनलचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी मालवण येथे दिली.

मालवण दौर्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी बंदर जेटी परिसरात नव्याने बांधलेल्या प्रशस्त जेटी व टर्मिनल इमारत पाहणी केली. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे अभियंता पेटकर, गायकवाड, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, साहेबराव कदम यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, संमेश परब, पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू, किल्ला प्रवासी होडी संघटनेचे मंगेश सावंत, यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली येथील पूर्वीची जेटी ही जीर्ण बनल्याने याठिकाणी नवीन जेटी बांधण्यात यावी अशी मागणी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, नगराध्यक्षांसह शिवप्रेमी, किल्ले प्रेमींनी केली होती. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करून चार वर्षापूर्वी याठिकाणी नवीन सुसज्ज जेटीच्या बांधकामास मंजुरी मिळाली. सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज अशी जेटीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी सनशेड आणि कंपाउंडचे काम शिल्लक असून या कामासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. लवकरच हे कामही मार्गी लावले जाईल.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथेही नवीन जेटी प्रस्तावित करण्यात आली आहे. याठिकाणी ओहोटीच्यावेळी नौका लावताना समस्या भेडसावते. ही समस्या दूर केली जाईल.
एकूणच येथील नव्या जेटीमुळे पर्यटकांना अधिक सुलभता निर्माण होईल. येथील निसर्ग सौंदर्याचा अधिक आनंद घेता येईल.
समुद्रातून प्रवास करणाऱ्या मोठ्या नौकांसाठी याठिकाणी सुसज्ज टर्मिनल उभारणीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के केंद्र शासन असा १०० कोटीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास मोठ्या प्रवासी नौकांना फायदा होईल. यादृष्टीने आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.