*कोकण Express*
*केंद्राच्या मॉनिटरिंग टीमने कणकवलीत केंद्र शासन योजना लाभार्थ्यांशी साधला संवाद*
*केंद्राच्या विविध योजनांबद्दल जनतेकडून घेतला आढावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो का? त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत? योजनांमध्ये काय बदल अपेक्षीत आहेत, या अनुषंगाने नॅशनल लेव्हल मॉनिटरींग टीमच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेत पडताळणी करण्यात आली. तसेच अपेक्षीत बदलाबाबत चर्चाही करण्यात आली. या मॉनिटरींग टीमसाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेचे एस. जानसुंदर बल्ली व एस. अबिद यांनी तालुक्यातील नरडवे येथे भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, संजय गांधी योजना नायब तहसीलदार तानाजी रासम, विस्तार अधिकारी आर. एल. शिंदे व इतर उपस्थित होते.
या टीमच्या माध्यमातून नरडवे येथे केंद्र शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या राष्ट्रीय निवृत्तीवेतनाच्या योजनांबाबतही लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मिळणारे अनुदान पुरेसे आहे का? त्यात काय वाढ अपेक्षीत आहे, याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच त्यांच्या पासबुकवर मिळालेला लाभ शासनाच्या धोरणानुसार आहे का? याबाबतही तपासणी करण्यात आल. तसेच एमआरईजीएसचे लाभार्थी व इतर केंद्र शासनाच्या योजनांबाबतही प्रत्यक्ष लाभार्थ्याची भेट घेत माहिती घेतली.