*कोकण Express*
*कणकवली विभागात वीज बिल न भरल्यास पुरवठा खंडीत करणार-बाळासाहेब मोहिते*
*थकीत वीज ग्राहकांना वीज वितरणचा इशारा; ४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली विभागात थकीत वीज बिल वसुलीसाठी वारंवार आवाहन करुनही वसुली होत नसल्याने अखेर महावितरणने थकीत वीज बिलांप्रकरणी वीज कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई सुरु केली आहे.कणकवली विभागात सुमारे
४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
गणेशोत्सवानंतर आतापर्यंत कणकवली विभागातील कणकवली , मालवण , देवगड , वैभववाडी या चार तालुक्यांमधील सरासरी ४ हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आले आहे . या ग्राहकांची २ कोटी ७५ लाख ४१ हजार एवढी वीज बील थकबाकी आहे.
कणकवली विभागात २६ कोटीची थकबाकी आहे. त्यापैकी आज पर्यंत आचरा विभागातिल १ कोटी ३४ लाख, देवगड तालुक्यात २ कोटी ४५ लाख, कणकवली तालुक्यातील ३ कोटी १४ लाख , मालवण तालुक्यातील २ कोटी २४ लाख आणि वैभववाडी तालुक्यातील १ कोटी ८८ लाख एवढी वीज बिल थकबाकी वसूल करण्यात आली आहे . वारंवार आवाहन करूनही ग्राहक वीज बिल भरत नसल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेत धडक कारवाई केली असल्याचे बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले.