*कोकण Express*
*मंत्रिपदासाठी त्यांनी मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडले*
परशुराम उपरकर यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार दीपक केसरकर हे गेले वर्षभर त्यांच्या मतदारसंघात फिरकले नाहीत. याचे कारण आजारपण नव्हे, तर मंत्रीपद न मिळाल्याची नाराजी हेच आहे. मंत्रिपदासाठी त्यांनी मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केली
श्री उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, आजारपणामुळे मतदार संघात आलो नसल्याचे दीपक केसरकर वारंवार सांगत आहेत. मात्र कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून ते मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी टीकाटिप्पणी सुरू केली आहे.
ते म्हणाले, चांदा ते बांदा योजना बंद करत सिंधू-रत्न योजना मुख्यमंत्र्यांनी आणली. तेव्हा मुख्यमंत्र्यांवर केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर यांच्यावर आपण किती प्रेम करतो आणि त्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे, याबाबतचा दिखाऊपणा ते करत आहेत. वस्तुत: केसरकरांना बाजूला करण्यात खासदार विनायक राऊत यांचा हात असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. केसरकर यांनी त्याबाबतचे स्पष्टोक्ती दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे आणि शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे सच्चा शिवसैनिक कार्यकर्ता विस्कळीत झाला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर प्रचंड राग
दीपक केसरकर हे राष्ट्रवादीत असल्यापासून त्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी सख्य नव्हते. सामंत पालक मंत्री झाल्यानंतर के सरकारांचा राग आणखी उफाळून आला. त्यामुळेच जिल्ह्यात मंत्रीपद असायला हव आहे. वैभव नाईक यांना मंत्री केलं असत तर त्याला माझा विरोध नव्हता, असे आता केसरकर सांगत आहेत. पण त्यावेळी कुठेही बोलताना दिसले नाही.
उपरकर म्हणाले, केसरकर पालक मंत्री असताना त्यांनी जिल्हा विकासाबाबत वारेमाप आश्वासने दिली होती. अनेक कामांची भूमिपूजन देखील झाले. प्रत्यक्षात मात्र एकही काम उभे राहिले नाही. त्यामुळेच चष्मा कारखाना,आयटी पार्क, ८०० लोकांना नोकऱ्या व अन्य आश्वासनाचे काय झाले ?केलेल्या घोषणा केव्हा पूर्ण करणार? असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.