सामंत बंधूंच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करावी!

सामंत बंधूंच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करावी!

*कोकण Express*

*सामंत बंधूंच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करावी!*

*आमदार नितेश राणेंची भाजपनेते किरीट सोमय्यांकडे मागणी!*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व त्यांचे पडद्यामागून भ्रष्ट कारभार सांभाळणारे बंधू किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांमधील शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे. याचीही चौकशी आपल्याकडून करण्यात यावी आणि या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करावी, अशी मागणी आम. नितेश राणे यांनी माजी खास. व भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याजवळ केली आहे.

आमदार नितेश राणेंनी भाजपाचे फायरब्रँड नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याकडून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे सद्या बाहेर काढली जात असून भविष्यात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या दृष्टीने आपण उघडलेल्या मोहीमेमुळे महाराष्ट्रीय जनतेला निश्चितच अभिमान वाटत आहे. सद्या कोकणात विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल परब व उदय सामंत यांनी सत्तेच्या माध्यमातून गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यापैकी अनिल परब यांची चौकशी आपल्या तक्रारीवरून सुरू आहे. त्याचप्रमाणे उदय सामंत व त्यांचे पडद्या मागून भ्रष्ट कारभार सांभाळणारे बंधू किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांमधील शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे.

अशी तक्रार आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली आहे.
किरण सामंत यांची मे . आर . डी . सामंत कन्सट्रक्शन कंपनी असून तिच्यामार्फत दोन्ही जिल्ह्यामधील करोडो रूपयांच्या कामांचे ठेके पदरात पाडून अधिकार्‍यांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत. त्यामध्ये बोगस कंत्राटदार उभे करून त्यांचे मार्फत कामे केली जात आहेत. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पर्ससीन नेटधारक व एल. ई. डी. धारक यांचेकडून करोडो रूपयांची वसुली दरमहा करण्यात येत असल्याबाबत मी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचेकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे व्हाईस चॅन्सलर नियुक्त्याांमध्येही गैरमार्ग अवलंबल्याचे पुरावे आपणाकडे लवकरच सादर करीत आहोत. अशाप्रकारे मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबतचे सर्व पुरावे लवकरच आपणास सादर करण्यात येतील, असे राणे यांनी किरीट सोमय्या यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!