*कोकण Express*
*येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाच उद्घाटन!*
*उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही; राणेंनी डिवचलं!*
*चिपी विमानतळाच्या श्रेयावरून राणे आणि शिवसेनेत जुंपणार?*
*नवी दिल्ली – ता. ७ :*
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, असं सांगतानाच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेतच, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या श्रेयाचा वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे!
नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. तसेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीखही जाहीर केली. विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर असं काही नाही. मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं राणे म्हणाले.
येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपीचं उद्घाटन!
येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे. मी आणि ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. तिथून सिंधुदुर्गाला जाणार आहोत. सात वर्ष हे विमानतळ बांधून तयार होतं. वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी ज्योतिरादित्य शिंदेना आज सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाचा वेळ घेतला, असं राणे म्हणाले.
आम्ही स्थानिक नाही का?
या विमानतळाचं क्रेडिट घेण्याचा प्रश्न नाही. 2014पर्यंत मी विमानतळ बांधून घेतले. मी स्थानिक नाही का? नितेश राणे आणि निलेश राणे स्थानिक नाही का? हे विमानतळ आम्ही बांधलं. त्याचं उद्घाटन करण्याचा आमचा अधिकार आहे. श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. जे कोणी म्हणतं आम्ही स्थानिक आहे. त्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलावं. आम्ही मंत्र्याशी रितसर बोललो आणि वेळही घेतली आहे. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते मला माहीत नाही. जे परवानगी देणारे मंत्री आहेत त्यांच्याशी भेटून मी बोललो त्यांनी मला हा कार्यक्रम दिला आहे, असं ते म्हणाले.
राणेंची कुरघोडी?
5 सप्टेंबर रोजी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती दिली होती. चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, राणेंनी आता विमातळ सुरू होण्याची नवी तारीख जाहीर करून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेना आणि राणेंमध्ये श्रेयाची लढाई सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.