*कोकण Express*
*केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात विक्रमी लसींचा पुरवठा*
*100% लसीकरण झालेला देशातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होईल*
*जिल्हा परिषद गट नेते रणजित देसाई यांनी व्यक्त केला विश्वास*
*मालवण ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा “अच्छे दिन” यायला सुरुवात झालेली आहे. याचेच उदाहरण म्हणजे गेल्या तीन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत जेव्हा लसींचा तुटवडा होता तेव्हा त्याचे खापर केंद्र सरकारच्या डोक्यावर मारणारे महाविकास आघाडीचे आमदार व खासदार केंद्र सरकारच्या माध्यमातून लसींचा पुरवठा झाल्यावर त्यांचे श्रेय घेण्याकरता धडपड करत आहेत. जेव्हा लसींचा तुटवडा होता तेव्हा तो केंद्र सरकारने केला असे म्हणायचे आणि जेव्हा लस मुबलक प्रमाणात मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांचे कौतुक करायचे ही पद्धत या लोकप्रतिनिधी बंद करावी. कारण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे व त्यामुळेच लसींचा पुरवठा हा कोणाच्या माध्यमातून होतो हे त्यांना चांगलेच माहित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी नारायणराव साहेब यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला जास्त लक्ष देण्याची मागणी केली होती. नारायणराव राणे साहेब हे केंद्रात मंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप मिळायला सुरुवात झालेली आहे. भविष्यात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातून १८ वर्षे वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल व संपूर्ण देशात १००% लसीकरण झालेला पहिला जिल्हा म्हणून जिल्ह्याचे नाव घेतले जाईल अशी अपेक्षा देखील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व भाजपा गटनेते रणजित देसाई यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर या लसीकरण मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरता दिवस-रात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे देखील योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले व त्यांचे आभार मानले. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याने सर्वच योजना व मोहिम यशस्वीपणे राबवून जिल्ह्याचा एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तीच परंपरा कायम राखून या वेळीदेखील सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील १००% लसीकरण झालेला पहिला जिल्हा म्हणून नावारूपास येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
