*कोकण Express*
*बंद असलेला आंबोलीतील पर्यटन व्यावसाय सुरू करा..*
*महेंद्र सांगेलकर; सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कोरोना महामारीमुळे बंद असलेले आंबोली येथील वर्षा पर्यटन सुरू करा, अशी मागणी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
आंबोली येथील वर्षा पर्यटनावर पंचक्रोशीतील व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये हे वर्षा पर्यटन कोरोना महामारीमुळे बंद असल्याने त्यांच्या व्यवसायांवर पूर्णतः परिणाम होऊन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने बाजारपेठा उघडण्यासाठी नियमावली घालून दिली आहे. तसेच काही नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. त्याच धर्तीवर आता आंबोलीचे वर्षा पर्यटन सुरू करण्यात यावे. सद्यस्थितीत वर्षा पर्यटनाचा हंगाम आटोपता आला असला तरी यापुढे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना धबधबे तसेच इतर पर्यटन स्थळी जाण्यासाठी मुभा देण्यात यावी, पोलिसांकडून होणारी आडकाठी थांबवण्यात यावी, असे झाल्यास याठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचा व्यवसाय होऊन त्यांना आर्थिक मदत होणार आहे. आंबोली मुख्य धबधबा परिसरामध्ये असलेल्या टपऱ्या दोन वर्ष बंद आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असे. मात्र ही उलाढाल बंद झाल्याने अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यातून सुटका होण्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने आपण तोडगा काढावा, अशी मागणी श्री. सांगेलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
