*कोकण Express*
*राणेंच्या मंत्रिपदामुळेच कोकणातील विकासाची पोकळी भरणार*
*७ दिवस चालणार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वादयात्रा*
*भाजपा प्रदेश चिटणीस तथा जन आशीर्वाद यात्रेचे मुख्य संयोजक प्रमोद जठार यांची माहिती*
*कणकवली ः संजना हळदिवे*
केंद्राच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना स्थान मिळाल्याने आता कोकणच्या विकासाचा बॅकलाॅक भरून निघणार आहे. रिफायनरीसह अनेक उद्योगांची उभारणी पुढील काळात होऊन कोकणात हजारो-लाखो रोजगार संधी निर्माण होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस आणि राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे मुख्य संयोजक प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. सिंधुदुर्गात राणेंचे न भूतो न भविष्यती असे स्वागत होईल असेही ते म्हणाले.
जन आशीर्वाद यात्रेच्या अनुषंगाने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आढावा बैठक येथील प्रहार भवनमध्ये झाली. त्यानंतर याबाबतची माहिती जठार यांनी दिली. त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, ॲड.अजित गोगटे आदी उपस्थित होते.
जठार म्हणाले, राणेंच्या माध्यमातून आता कोकणचा संपूर्ण कायापालट होणार आहे. केंद्रीयमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच कोकण आणि सिंधुदुर्गात येणार असल्याने त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात भव्य स्वागत होणार आहे. या यात्रेत राणेंची कुठेही जाहीर सभा होणार नाही. तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ते येत आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सात वर्षात केलेली दिमाखदार कामगिरी जनतेपर्यंत पोचविण्याचाही प्रयत्न आहे.
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत विविध क्षेत्रातील कारागिरांचा सत्कार होणार आहे. चिपळूण, खारेपाटण येथील पूरग्रस्तांशी राणे संवाद साधणार आहेत. तसेच विविध संस्था, प्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक यांची निवेदने देखील राणे या यात्रेत स्वीकारणार आहेत. मराठा, मुस्लीम, ओबीसी, बुद्धीष्ट आदी सर्व समाज आणि संघटनांच्यावतीन राणेंचे स्वागत होणार असल्याचे जठार म्हणाले.
२५ ऑगस्टला जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे येतील. तेथून तळेरे, नाधवडे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे ते कणकवलीत दाखल होणार आहेत. २६ रोजी ते सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांचा दौरा करतील. तर २७ रोजी देखील त्यांचा मुक्काम सिंधुदुर्गात राहावा यासाठी भाजपची मंडळी प्रयत्नशील असल्याची माहिती जठार यांनी दिली.
राणेंच्या स्वागताची जन आशीर्वाद यात्रा सर्वाधिक लांबीची आहे. ११ जिल्हे, ९ लोकसभा आणि ३३ विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करून या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे होणार आहे. तब्बल ३०० पेक्षा जास्त ठिकाणी राणेंचे स्वागत होणार असल्याचेही जठार म्हणाले.